Sunday 21 February 2016


                


                हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुला या २६ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली. त्यानंतर देशात मोठा हलकल्लोळ माजला आहे. रोहित हा दलित असल्यामुळेच त्याच्यावर आत्महत्या करण्याची पाळी आणली गेली असे सांगितले जाऊ लागले आहे. दरम्यान, आम्ही दलित नाही, असे रोहितच्या काकाने तर आम्ही दलितच असल्याचे रोहितच्या आईने सांगितले आहे. मुळात या एकूणच प्रकारामागे आंबेडकरद्रोही डावे आणि देशबुडवी सेक्युलर जमात असल्याचे पुरेसे स्पष्ट झाले आहे. परंतु, आजही मीडियामध्ये सेक्युलर जमातच प्रभावी असल्याने या प्रकरणाला दलित विरुद्ध आरएसएसवाले असा रंग देण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.
मध्यंतरी कर्नाटकातील वृत्तपत्रात एक बातमी प्रसिद्ध झाली. झाडाखाली थांबलेला दलित युवक वीज पडून ठार, असे बातमीची शीर्षक होते. यावर कर्नाटकातील एक संवेदनशील दलित कवी विचारतो, "झाडाखाली थांबलेला तरुण कोणत्या जातीचा होता, हे पाहून वीज पडते काय? कोणत्याही घटनेकडे जातीच्याच चष्म्यातून पाहणे आपण कधी थांबवणार?' दुर्दैवाने, आपल्या देशात कोणत्याही घटनेकडे पाहताना जात आणि धर्म हेच निकष वापरले जात आहेत. हे सारे अजाणतेपणाने घडत असेल तर प्रबोधन करून हळूहळू ही मानसिकता बदलता येणे शक्य आहे. पण वास्तव तसे नाही. वरवर पाहता हे सारे उत्स्फूर्तपणे घडत असल्याचे भासवले जात असले तरी यामागे या देशाला खिळखिळे करण्याचे मोठे षडयंत्र आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे आणि कृती मात्र बाबर, औरंगजेब, अफझलखान, टिपू यांना साजेशी करायची. नाव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे घ्यायचे आणि कृतीतून मात्र आंबेडकरांच्या विचारांशी द्रोह करायचा अशा षडयंत्राला खतपाणी घालण्याचे काम मिशनरी, नक्सली आणि जिहादी शक्ती पडद्यामागून करत आहेत. धर्मवीर संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची नावे संघटनेला दिल्यामुळे काॅलेजची तरुणाई आपसूकच या गटांकडे आकर्षली जाते. यासाठी दोन चार रुपयांची चिटोरीछाप पुस्तके छापली जातात. त्यातून कोवळ्या तरुणाईच्या मनात हिंदू धर्माबद्दल विष कालवले जाते. हैदराबाद येथील रोहित वेमुला हा तरुणही दुर्दैवाने अशा सापळ्यात अडकला. शेवटी त्याला नैराश्य आले आणि त्याने आत्महत्या केली. या आत्महत्येलाही जातीचा रंग चढवण्यात आला.
रोहित वेमुला याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेले पत्र खूपच हृदयस्पर्शी आहे. या पत्रात तो म्हणतो की, "मी गेल्यावर माझ्या मित्रांना वा शत्रूंना त्रास नका देऊ.' त्याचे संपूर्ण पत्र वाचले की ध्यानात येते, आधीचा रोहित त्याच्या जीवनाच्या शेवटच्या दिवसांत खूपच बदललेला असला पाहिजे. रोहित निराश का झाला, आत्महत्या करण्याच्या विचाराने त्याचा ताबा कसा घेतला, हे समजून घेण्यासाठी थोडे मागे जाणे आवश्यक आहे.
रोहित हा याकूब मेमन या अतिरेक्याच्या फाशीच्या विरोधात होता. तो एएसए (आंबेडकर स्टूडंट्स असोसिएशन) चा सदस्य होता. देशाच्या विरोधात युद्ध पुकारणाऱ्या याकूबची फाशी रद्द व्हावी यासाठी एएसएने युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये एका प्रार्थना सभेचे आयोजन केले होते. "तुम कितने याकूब मारोगे? हर घर में याकूब निकलेंगे' असे लिहिलेले फलक झळकवले गेले. विद्यापीठातील या देशद्रोही निदर्शनाविरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सुशिल या विद्यार्थ्याने त्याच्या फेसबुक वाॅलवर परखड प्रतिक्रिया लिहिली आणि निषेध केला. याचा राग मनात धरून एएसएचे ३० ते ४० तरुण सुशीलच्या वसतीगृहात घुसले. सुशीलला जबर मारहाण केली. फेसबुकवरील ती पोस्ट िडलिट करायला लावली आणि जबरदस्तीने माफीचा पोस्ट लिहिण्यास भाग पाडले गेले. गंभीर जखमी झाल्याने सुशिलला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करावे लागले. ही घटना आॅगस्ट २०१५ मधील आहे.
मग सुशिलच्या आईने विद्यापीठात जाऊन तक्रार केली. मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांना कोर्टात खेचलं. यावर विद्यापीठाने रोहित आणि त्याच्या ४ साथीदारांना वसतीगृहातून काढून टाकलं. पण वर्गात बसण्याची आणि ग्रंथालय वापरायची परवानगी दिली. या सगळ्या घटनाक्रमात रोहित हा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मानणारा होता, असे कसे म्हणता येईल?
काॅलेजचे, विद्यापीठाचे नियम धाब्यावर बसवून गुंडगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करायची नाही की काय? या ठिकाणी दलित आणि सवर्णचा संबंध येतोच कुठे? रोहित हा गरीब कुटुंबातून होता. तो देशद्रोही याकूबचा समर्थक होता. याकूबला फाशी देण्याचा दिवस हा काळा दिवस असल्याचे तो म्हणायचा. काॅलेजमध्ये त्याने गोमांस पार्टी आयोजित केली. गुंडगिरी केली. त्यामुळे त्याला वसतीगृहातून काढून टाकले गेले. या साऱ्या घटनाक्रमातून त्याला मनस्ताप झाला असणार. त्याने स्वत:शी संवाद साधलेला असणार. गरीबीशी झुंज देताना ज्ञानार्जनासाठी आलेला रोहित डाव्यांच्या विषारी प्रचाराला बळी पडला. आणि त्याची ससेहोलपट झाली. त्यातून त्याला नैराश्य आले आणि त्याने स्वत:ला संपवून टाकले. त्यामुळे बाबासाहेबांचे नाव पुढे करून विद्यार्थ्यांना जिहादी विचारांचे समर्थक बनवणारे आंबेडकरद्रोही डावे बुद्धीजीवीच रोहितच्या आत्महत्येला जबाबदार आहेत.
रोहित हा दलित असल्याचे सांगून कांगावा करणारे कोण आहेत, हेही पाहणे गरजेचे आहे. मंबईच्या आझाद मैदानावरील दंगलीत एका महिला पोलिसावर विनयभंग (सरकारी भाषेत) झाला. ती माउली कित्येक महिने हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होती. तिचा हाॅस्पिटलमध्येच अंत झाला. तिही दलित समाजातील होती. रोहितच्या नावाने रडगाणे गाणारे कोणी त्यावेळी पुढे आले का? दलितांसाठी काम करण्याचा आव आणणाऱ्या एका तरी संघटनेने, पुरोगाम्याने, सहिष्णुतेची होलसेल एजन्सी असणाऱ्याने, मीडियाने तिची बाजू घेतली काय? त्या पोलिस महिलेचा विनयभंग नाही तर तिच्यावर सामूहिक बलात्कार झाले होते, असे दबक्या आवाजात म्हटले गेले. कोणी माई का लाल सत्यशोधनासाठी शोधपत्रकारिता केली काय?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभूतपूर्व अशा उपक्रमांची आखणी केली आहे. राजकारण, स्वार्थ आणि हिंदू धर्माविषयी द्वेषभावना वाढीस लावणे इतक्याच मर्यादित कारणांसाठी डॉ. बाबासाहेब यांच्या नावाचा वापर करणार्‍यांची दुकानदारी आता बंद पडत चालली आहे. डॉ. बाबासाहेब यांचे सर्व समाजाला जोडणारे विचार, राष्ट्रवादी विचार प्रभावीपणे समोर आणण्याचे काम केंद्र सरकारने सुरू केले आहे. त्यामुळे रोहितच्या प्रेताचा मसाला करून विकण्याचा किळसवाणा प्रकारे आंबेडकरद्रोही डावे आणि देशबुडवे सेक्युलर निगरगट्टपणे करत आहेत.
हैदराबाद विद्यापीठ परिसरात अतिरेकी समर्थक प्रवृत्ती वाढत असल्यावरून केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी मनुष्यबळविकास मंत्री स्मृती इराणी यांना पत्र लिहिले तर त्यात वावगे काय, असा प्रश्‍न भाजपने केला आहे. पक्षाचे तेलंगण कार्यालयाने एक व्हिडीओ क्लीप पुढे आणले आहे. यामध्ये रोहित हा देशविरोधी शक्तीचे समर्थन करताना दिसतो. श्री. दत्तात्रय यांनी कट्टरतेच्या विरुद्ध तक्रार दिले होती, एखाद्या व्यक्तीच्या विरोधात नव्हे, असेही भाजपने सांगितले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रोहित याच्या विरोधात झालेली शिस्तभंगाची कारवाई न्यायालयाच्या आदेशानुसारच झाली होती. तो दलित असणे किंवा नसण्याचा काही संबंधच येत नाही, अशी माहिती तेलंगणातील करीमनगरचे असलेले भाजप महासचिव पी. मुरलीधर राव यांनी दिली आहे. या सगळ्या मुद्द्यांची चौकशी झाली पाहिजे. आणि कोणी दोषी असेल तर त्याला शिक्षाही झाली पाहिजे. परंतु, डाव्यांचा एक गट समाजातील दरी कशी वाढेल याच्याच प्रयत्नात सातत्याने असतो, हे लपून राहिलेले नाही. 
कोणतीही घटना घडली की त्याचे भांडवल करत समाजात दुही निर्माण करण्याचा जोरदार प्रयत्न होतो. यात मीडियातील काही मुखंड जाणीवपूर्वक तर काही अजाणतेपणी दुष्प्रचार करत राहतात. या दृष्टीने जवखेडाचे उदाहरण खूपच बोलके आहे. सवर्णांनीच दलित तरुणाचा खून केल्याच्या बिभत्स कथा रचण्यात आल्या. वृत्तवाहिन्या आणि वृत्रपत्रे ओसंडून वाहिल्या. पण जवखेडा प्रकरण भावकीतील वादातून झाल्याचे सत्य समोर आले तेव्हा एकाही मीडियाबहाद्दराने माङ्गी मागितली नाही. डाव्यांच्या एका कंपूने सत्यशोधन करण्याचेही नाटक केले होते. जवखेडा प्रकरणावरून नक्सली सक्रिय झाल्याचेही पुढे आले होते.   
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव पुढे करत तरुणांना कशा रीतीने बहकवले जाते याचे उदाहरण स्वत: रोहितच आहे. त्याच्या फेसबुक वॉलवर तो काय लिहित होता, यावरून त्याची विचारधारा कळते. ज्या महापुरुषासमोर संपूर्ण जग नतमस्तक झाले, ज्या महापुरुषाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, 'भगवान बुद्धानंतर जर कोणी महापुरुष या भारतवर्षात अवतरित झाला असेल तर ते स्वामी विवेकानंद होत.' त्या स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल रोहित आपल्या फेसबुकवर लिहितो, 'विवेकानंद हे जातीव्यवस्थेचे समर्थक, नारीद्रोही, मंदबुद्धी, अहंकारी आणि संधीसाधू होते.' सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश, निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त, कायदामंत्री, पंतप्रधान, मुख्यमंत्री आदी सर्वांना नपुंसकसारख्या शब्दांचा वापर करतो. 
कालबाह्य क्रांतीचा हट्ट धरणारे, नक्षलवादाला माणसं पुरवणारे, नक्सलवादी कारवायांचे समर्थन करणारे, जिहादी विचारसरणीला पाठिंबा देणारे लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीचे असूच शकत नाहीत. रोहित वेमुलासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या निरागस तरुणांना आपल्या सापळ्यात ओढून आपले स्वार्थ साधण्याचे काम तेवढे ते करू शकतात. उद्योजक मिलिंद कांबळे यांच्याप्रमाणे दलित तरुणांना सकारात्मक मार्गाकडे नेण्याऐवजी विद्वेषाच्या आगीत ढकलण्याचे काम कथित सेक्युलर आणि डावे करतात. डावे बुद्धीजीवी आणि स्वयंघोषित सेक्युलर ही गिदाडे आहेत. समाजाच्या एकोप्याशी त्यांचे देणेघेणे नाही. समाज शतखंडीत कसा होईल, यासाठी समाजाच्या जखमांना टवकी मारण्याचे घृणास्पद काम हे करत आहेत. प्रत्येक गोष्टीकडे राजकीय फायद्या तोट्यातून पाहण्याच्या या काळात अशांना खड्यासारखे दूर करणे खूप कठीण आहे. पण ते काम करावंच लागेल. अन्यथा समाजाचे अतोनात नुकसान होईल. डॉ. बाबासाहेब यांच्या १२५ व्या जयंती वर्षात देशाला जोडणारे बाबासाहेबांचे विचार पुढे आणणे हाच यावर उपाय आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ''आपल्याला ज्या मार्गाने जावयाचे आहे, तो मार्ग चिरस्थायी असावा। जो मार्ग अराजकतेकडे जातो, जो जंगलाकडे नेतो, असा मार्ग अनुसरण्यात काही अर्थ नसतो. जो मार्ग आपणास आपल्या इसिप्त ध्येयाप्रद सुरक्षित पोचवितो, जो आपले जीवन बदलवितो, असा मार्ग कितीही लांबचा असला तरी तो जवळच्या मार्गापेक्षा निश्चितच श्रेयस्कर असतो.
कार्ल मार्क्स अगर कम्युनिस्ट-कम्युनिझमचे ध्येय साध्य करण्याकरिता म्हणजेच गरिबी निवारण्यासाठी, खाजगी मालमत्ता नष्ट करण्यासाठी विरोधकांची हत्या करणे, त्यांना ठार मारणे हे साधन वापरू इच्छितात आणि येथेच बुद्धिझम आणि कम्युनिझममधील मूलभूत फरक आहे। भगवान बुद्धाचे मार्ग लोकांना हिंसेपासून परावृत्त करण्याचे, युक्तिवादाने पटवून देण्याचे, नैतिक शिकवण देण्याचे व ममतेचे आहेत. कम्युनिस्ट पद्धती ही पाशवी शक्तीवर आधारलेली आहे. कम्युनिस्ट पद्धती रशियन लोकांनी राजीखुषीने स्वीकारलेली नाही. त्यांनी ती भीतीमुळे स्वीकारलेली आहे. यादृष्टीने पाहिले तर बुद्धिझम शुद्ध लोकशाहीवादी आहे. अभ्यासू वृत्तीने बुद्धिझम व कम्युनिझमचा दीर्घकाळ अभ्यास करून मी या ठाम निर्णयास आलो आहे की, मनुष्यमात्राचे दु:ख निवारण्यासाठी जो बुद्धाने उपदेश केला आहे व जी पद्धती सांगितली आहे, ती अतिशय सुरक्षित व पक्की आहे.''

- सागर सुरवसे.
मोबा : 9769179823
(पुर्व प्रसिद्धी : दै. तरूण भारत, आसमंत, २४ जाने २०१६) 

Monday 15 February 2016


                 साधारणपणे 2011 साली पत्रकारितेत येण्याचा विचार मनात आला. त्यामुळे अनेक थोरा-मोठ्या पत्रकारांच्या भेटी घेतल्या. त्यावेळी अनेकांनी वाचन वाढविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार ऑक्टोबर महिन्यात ग्रंथालयाचा सभासद होण्यासाठी काय करावे लागेल याची माहिती घेण्यासाठी पुणे मराठी ग्रंथालयात गेलो. त्यावेळी समोरच्या एका रॅकमध्ये असलेले एक मासिक सहज चाळण्यासाठी घेतले. पत्रकारितेचा आरंभ करताना मासिक म्हणजे काय असते हे पहिल्यांदाच पाहत होतो. त्याचवेळी त्या मासिकाचे नाव थोडं विचित्रच वाटलं. नाव तसं नियमित ऐकण्यातलं, मात्र ते मासिकाचं नाव असणं थोडं हटके वाटलं. अंक चाळत गेलो तेव्हा त्यातील विषयही वाचले. बसल्या बसल्या त्यातील संपादकीय लेखावर सहज नजर गेली. चार ओळी वाचाव्या म्हणून हाती घेतल्या आणि संपूर्ण लेख वाचून कधी झाला ते कळले नाही. मेंदूला झिणझिण्याच आल्या. लेख वाचल्यानंतर खाली नाव होते, घनश्याम पाटील, संपादक, साहित्य चपराक. मला वाटले कोणीतरी बुजुर्ग व्यक्ती असावेत. कारण त्यातील भाषाच तशी पोक्त होती. म्हणून संपूर्ण संपादक मंडळ पाहिले. त्याचवेळी त्याखाली एक ओळ लिहिली होती, 'अंकातील मजकुराशी संपादक कदाचित सहमत असतीलही.' ही एक वेगळीच धाटणी पाहून या संपादकांना भेटावे असे वाटले. ताबडतोब त्यातील नंबरवर फोन लावला मात्र तो फोन काही रिसिव्ह झाला नाही.
त्यानंतर काही दिवस असेच गेले. ते मासिक विवेकानंद केंद्रातही पाहायला मिळाले. त्यात आमचे सोलापूरचे मित्रवर्य सिद्धाराम पाटील यांचा ‘कसाब निर्मिती कारखान्याचे काय?’ हा लेख वाचायला मिळाला. लागलीच सिद्धाराम पाटलांना फोन केला. ‘चपराक’च्या संपादकांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी लागलीच घनश्याम पाटील यांना फोनाफोनी करून भेटण्याचा मार्ग मोकळा करून दिला. पुढे 10 नोव्हेंबरला त्यांनी भेटण्याची वेळ दिली आणि भेट झाली. त्यांना भेटल्यानंतर हेच संपादक असल्याचा विश्वास बसेना. कारण आपल्या वयाचा संपादक असू शकतो हे पहिल्यांदाच पाहत होतो. त्यातही तो मेंदूला झिणझिण्या आणणारा अग्रलेख वाचून तर त्यावर विश्वासच बसेना. पहिल्या भेटीतच मी घनश्याम सरांना कामाची संधी देण्याची विनंती केली. त्यांनीही लागलीच रूजू होण्यास सांगितले आणि 11 नोव्हेंबर 2011 पासून माझ्या पत्रकारितेला सुरूवात झाली.
त्या दिवसापासून घनश्याम पाटील हे रसायन समजून घेण्याचा प्रयत्न आजतागायत सुरू आहे. घनश्याम पाटील यांच्या सहवासात अनेक दिवस काम केले. त्या काळात त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलू मला अनुभवायला मिळाले. साहित्याबाबतची त्यांची तळमळ अनेक घटनांमधून समोर येते. त्यांचे साहित्यप्रेम सांगणारी एक घटना म्हणजे उमेश सणस लिखित ‘शिवप्रताप’ ही ‘चपराक प्रकाशन’ची पहिली वहिली कादंबरी. एप्रिल 2006 साली या कांदबरीचे प्रकाशन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतरचा हा प्रसंग. सातार्‍यामधील एका पुस्तक विक्रेत्याने साधारण सायंकाळच्या सुमारास फोन केला. ‘‘शिवप्रताप कादंबरीच्या पाच प्रती हव्या आहेत. आमचे एक ग्राहक उद्या अमेरिकेला जाणार आहेत. त्यांना तेथील मराठी भाषिकांसाठी या प्रती हव्या आहेत.’’ त्यावर प्रकाशक या नात्याने घनश्याम पाटील यांनी त्यांना शब्द दिला की, ‘‘सकाळी 7 वा तुम्हाला कॉपीज मिळतील.’’ त्यानुसार पाटील यांनी थंडीची तमा न बाळगता रातोरात दुचाकीवर प्रवास करून सकाळी सात वाजता त्या पुस्तक विक्रेत्याला शिवप्रतापच्या पाच प्रती पोहोच केल्या. प्रकाशक स्वतः या प्रति घेऊन आले आहेत हे कळल्यानंतर मात्र तो पुस्तक विक्रेता आश्चर्यचकीत झाला. ‘‘केवळ पाच प्रती देण्यासाठी आपण एवढ्या दूर प्रवास करून आलात. यात तुम्हाला काय फायदा मिळणार?’’ त्यावर पाटील म्हणाले, ‘‘यातून आर्थिक फायदा जरी मिळणार नसला तरी या सुंदर कलाकृतीपासून अमेरिकेतील माझे मराठी बांधव दूर राहू नयेत अशी माझी इच्छा आहे. शिवाय एखाद्या लेखकाचे किंवा प्रकाशकाचे पुस्तक अमेरिकेत वाचले जाणार असेल तर त्याहून मोठा आनंद कोणता?’’ घनश्यामजींनी दिलेले उत्तरच त्यांची साहित्यविषयक तळमळ व्यक्त करते. एखाद्या क्षेत्राबाबतची तळमळ आव आणून शब्दातून व्यक्त करू शकतो मात्र प्रत्यक्ष कृतीतून दिसणार्‍या तळमळीला तोडच नसते. घनश्यामजींची तळमळ ही कृतीशील होती.
भेटायला येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला ते लिहिण्यासाठी उद्युक्त करतात. बस्स. लोकांनी लिहितं व्हावं यासाठी ते कायम आग्रही असतात. नवीन लेखक लिखाणाबाबत टीप्स मागायला आल्यावर ते सांगतात, ‘‘जो चांगला विचार करू शकतो तो चांगले लिहू शकतो.’’ लिखाणासाठी त्यांनी अनेकांना प्रोत्साहन दिले आहे. त्यातील एक जिवंत उदाहरण म्हणजे मी स्वतःच. घनश्यामजी नसते तर कदाचित मी आज पत्रकारितेतही नसतो. लिखाणाचे सर्व धडे त्यांच्याकडूनच घेतले. 2014 च्या दिवाळी अंकासाठी त्यांनी मला लेख लिहायला सांगितला. त्यानुसार कन्याकुमारी येथील विवेकानंद शिलास्मारक आणि विवेकानंद केंद्राचे संस्थापक एकनाथजी रानडे यांच्या कार्याचा आढावा घेणारा एक लेख मी लिहिला. अंक प्रकाशित झाल्यानंतर त्यांनी मला सांगितले की, ‘‘एकनाथजींवर आपण एक पुस्तक लिहावे.’’ त्यावेळी माझ्यात तो आत्मविश्वास नव्हता मात्र घनश्यामजींनी ज्या पद्घतीने मला आत्मविश्वास दिला त्यामुळे मी ते लिहू शकलो.
घनश्याम पाटील यांची पार्श्वभूमी आपल्याला आश्चर्यचकीत करते. कारण मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागातून येऊन पुण्यासारख्या शहरात आपले साप्ताहिक, मासिक आणि प्रकाशन संस्था चालवणे तशी सोप्पी गोष्ट नाही. इयत्ता सातवीच्या वर्गात असल्यापासून घनश्यामजी पत्रकारितेत आहेत. सुरवातीला किल्लारी भूकंपानंतर सोलापूर तरूण भारत या वृत्तपत्राचे किल्लारी वार्ताहर म्हणून त्यांनी काम पाहिले. दहावी झाल्यावर त्यांनी पुण्याकडे कूच केली. अकरावीला असतानाच त्यांनी ज्येष्ठ संपादक वसंतराव काणे यांच्या दै. संध्या या सायं दैनिकात कामाला सुरूवात केली. संध्या हे राज्यातील पहिले सायं दैनिक. त्यामुळे त्याला मोठी परंपरा. वसंतराव काणे यांच्या मुशीतच त्यांची आणखी जडण घडण झाली. काही कारणाने संध्यातील काम सोडल्यानंतर त्यांनी स्वतःचे मासिक सुरू करण्याचे ठरविले. बारावीच्या वर्गात असताना त्यांनी ‘चपराक’ हे मासिक सुरू केले. वयाच्या सतरा-आठराव्या वर्षी संपादकपद भूषवणारे राज्यातील ते एकमेव संपादक असावेत. ज्या वयात आपण कोणत्या क्षेत्रात जायचे याबाबत साशंकता असते त्या वयात घनश्यामजी एका मासिकाचे संपादक होते. 2003 साली त्यांनी ‘चपराक’ची सुरूवात केली. त्यानंतर पुढे दैनिकही चालवले. गेल्या 13 वर्षापासून ‘चपराक’ने राज्यासह राज्याबाहेरही आपली ओळख निर्माण केली आहे.
गेल्या 13 वर्षापासून घनश्यामजी अविरतपणे साहित्य क्षेत्रासाठी झटत आहेत. आपल्या ‘चपराक’ मासिकाच्या माध्यमातून त्यांनी अनेक लेखक तयार केले आहेत. तरूणांना त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यामुळे सागर कळसाईत सारख्या अवघ्या 23 वर्षाच्या लेखकाला त्यांनी ‘कॉलेजगेट’ या कादंबरीच्या माध्यमातून समोर आणले आहे. आज कॉलेजगेट कादंबरीच्या दोन वर्षात चार आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. सागर सारखे अनेक लेखक त्यांनी पुढे आणले आहेत. आज ‘चपराक प्रकाशन’च्या माध्यामातून घनश्यामजींनी 80 हून अधिक पुस्तके प्रकाशित करून साहित्याची सेवा केली आहे. दिवसरात्र केवळ साहित्याचाच विचार करणारे हे तरूण संपादक, प्रकाशक आता साहित्य परिषदेच्या निवडणुकीस उभे राहिले आहेत. मुळात त्यामागे त्यांचा हाच विचार की, केवळ काठावर राहून आपण पाण्याची खोली मोजू शकत नाही. त्यासाठी पाण्यात उतरणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांनी या निवडणुकीत उडी घेतली आहे. साहित्यविषयक आत्मियता असलेल्या मतदारांनी या निमित्ताने साहित्य परिषदेत काही निर्णायक बदल करण्यासाठी घनश्याम पाटील यांच्या पाठिशी उभे राहावे ही विनंती.
-सागर सुरवसे,
आयबीएन लोकमत,
सोलापूर
9769179823

Friday 8 January 2016

शासन निरपेक्ष शिक्षण व्यवस्थाच सर्व समस्येवरील रामबाण उपाय !
'मनुष्यातील दिव्यत्वाचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण' अशी शिक्षणाची साधी सोपी व्याख्या स्वामी विवेकानंदांनी केलीय. त्यांनी केलेल्या या व्याख्येनुसार आजची भारतीय शिक्षणपध्दती आहे का? याचे उत्तर नाही असेच येईल. कारण ती वस्तुस्थिती आहे. विवेकानंदांच्या काळात देशाची यंत्रणा ब्रिटिशांच्या ताब्यात होती. त्यामुळे व्यापक प्रमाणावर तिची कार्यपध्दती बदलणे अशक्यप्रायच गोष्ट होती. मात्र देश स्वातंत्र्य झाल्यानंतर तरी यात बदल करणे अपेक्षित होते. स्वतंत्र भारतात समाज जीवनाच्या सर्वच बाबी स्वतंत्रपणे मांडल्या जाणे अपेक्षित होते. दुर्दैवी की त्या तशा न मांडता आहे तीच व्यवस्था पुढे रेटली गेली. आज देशात शिक्षणाच्या नावाखाली लूटच सुरू असल्याची भावना जनसामान्यांमध्ये आहे. त्यामुळे ही भावना खोडून काढण्यासाठी शिक्षण पध्दतीत व्यापक बदल अपेक्षित आहेत.

भारतीय शिक्षण परंपरा ही अतिप्राचीन आहे. अनादिकालापासून भारताने साऱ्या विश्वाला मानवतेची शिकवण दिलीय. केवळ आध्यात्मिकच नव्हे तर हरतऱ्हेचे लौकिक शिक्षण भारताने जगाला दिलेय. विज्ञान तसेच औद्योगिक क्षेत्रातच भारत आघाडीवर होता असे नव्हे तर त्याच्या प्रगत शिक्षणाची पध्दतीदेखील भारतातच विकसीत झाली आहे. त्यामुळे साऱ्या जगभरातील विद्यार्थी भारतात येत होते आणि आजही येत आहेत. हजारोंच्या संख्येने भारतात येणाऱ्या विद्यार्थ्यासाठी अनेक गुरूकूलं होती. यासर्व कारणांमुळेच भारताला जगद्गुरू मानले जात होते. अकराव्या-बाराव्या शतकात मुस्लिम आक्रमकांनी नालंदा सारखी जागतिक विद्यापीठं जाळून नष्ट केली. त्यामुळे अशा आक्रमकांपासून आपली ज्ञानकेंद्र आणि ज्ञानसंपदा नष्ट होऊ नये या भितीने भारतातील अनेक मोठी विद्यापीठं बंद करण्यात आली. त्यातील ग्रंथसंपदा सुरक्षित ठेवण्यात आली. त्याची सुरक्षाच भारतासाठी महत्वाची होती. या सर्व संघर्ष काळानंतरही भारतातील शिक्षणाचा वटवृक्ष अबाधितच होता. खेडोपाडीही उच्च शिक्षणाची सोय त्या काळात होती. त्यावेळी मुस्लिम आक्रमकांनी मंदिर पाडून मश्जिद बांधण्याचाच उद्योग चालू ठेवला. मात्र येथील शिक्षण संस्थाच संस्कृती रक्षणासाठी पूरक होत्या हे त्यांच्या लक्षात आले नाही.
इंग्रजांनी १८२३ साली केलेल्या एका शैक्षणिक सर्वेक्षणात आढळून आले की, भारतात लाखोंच्या संख्येत शिक्षणसंस्था होत्या. प्राथमिक शिक्षण तर सर्वांनाच उपलब्ध होते. समाजातील ७६ टक्के लोक उच्च विद्या विभूषित होते. सुप्रसिद्ध स्वदेशी तत्त्वचिंतक धर्मपाल यांनी १९६६ साली लंडन मधील काही दस्तावेजांच्या संशोधनातून 'रमणीय ज्ञानवृक्ष' या ग्रंथात याबाबत सविस्तर वर्णन केलेय. देशाचे दुर्दैव असे की ४० वर्षांनंतरही हे क्रांतीकारक पुस्तक आपल्या कोणत्याच वर्गाच्या अभ्यासक्रमात नाही. या सर्वेक्षणात भारतीय शिक्षण व्यवस्थेचे अनेक रहस्य समोर आले आहेत. सर्व वर्णाच्या मुला-मुलींना शाळांमध्ये प्रवेश होता. शिकविणाऱ्या शिक्षकांध्येही शुद्रांसहित सर्वच वर्णाच्या शिक्षकांचा समावेश होते. यात एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे, प्राचीन काळापासून एकोणिसाव्या शतकापर्यंत भारतीय शिक्षण व्यवस्था पूर्णतः स्वायत्त होती. शिक्षणामध्ये शासनाचा कसलाच हस्तक्षेप नव्हता. आर्थिकदृष्ट्या देखील शिक्षण व्यवस्था स्वयंपूर्ण होती. १८२३ चे शैक्षणिक सर्वेक्षणाची पार्श्वभूमी हे स्पष्ट करते.
        १८१३ मध्ये कंपनी सरकार अर्थात ब्रिटिशांनी भुमीसुधार अधिनियमाद्वारे सर्व प्रकारच्या सार्वजनिक भूमिला शासकीय घोषित केले. यानंतर मंदिराची जमीन, गावची सामूहिक जमीनीसह शिक्षण संस्थांच्या जमिनीही शासनाने आपल्या ताब्यात घेतल्या. त्यामुळे शिक्षण संस्था चालवणे कठीण आणि हळूहळू अशक्य होऊन बसले. अनेक शाळा-महाविद्यालयं बंद पडली. त्यानंतर देशातील काही प्रतिष्ठित मंडळींच्या ब्रिटिश सरकारने यात हस्तक्षेप करण्याचे निवेदन दिले. ब्रिटीश शासनाच्या दबावाने भारतीय शिक्षण संस्थांना प्रतिवर्षी एक लाख रूपयांचे अनुदान देण्याचे जाहीर केले. भारतीय शिक्षण क्षेत्रातील हे पहिले अनुदान आहे. यापूर्वी शिक्षणाचे सरकारीकरण करण्याचे पाप द्रोणाचार्यांना राज्यसेवेत ठेवल्याने झाले. त्या महापापाची परतफेड महाभारताच्या नरसंहाराने झाली. या अनुदानाचे वाटप करण्यासाठी मेकॉले नामक वकिलाला सल्लागारपदी नियुक्त करण्यात आले. भारतात अशा किती शिक्षण संस्था आहेत ज्यांना अनुदान देतो येईल हे जाणण्यासाठी देशात एक शैक्षणिक सर्वेक्षण करण्यात आले. या वकील मेकॉलेने आपल्या कुटील बुध्दीने भारताच्या सर्वव्यापी, स्वायत्त, समाजाधारित आणि समृध्द शिक्षण व्यवस्था नष्ट केली. १८३५ साली त्याने शिक्षणव्यवस्थेचे संपूर्ण सरकारीकरण केले. भारतीयांना शिक्षण देण्यापासून कायदेशीररीत्या वंचित केले. केवळ कंपनी आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या शाळांनाच परवानगी देण्यात आली. मेकॉलेच्या शैक्षणिक धोरणाने देशात पहिल्यांदा जाती आधारित शिक्षण व्यवस्था निर्माण केली. ब्राह्मणांशिवाय इतर जातीच्या लोकांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले. कालांतराने क्षत्रिय आणि वैश्यांना अर्ज केल्यानंतर प्रवेश देण्यात आला, असंघटित नसल्याने क्षुद्र मात्र शिक्षणापासून वंचित राहिले. आगामी काही दशकातच भारतातील मागासवर्गीय समाज अशिक्षित झाला. १८२३ मध्ये जिथे ७६ टक्के लोकसंख्या सुशिक्षित होती ती स्वातंत्र्याच्या ६८ वर्षानंतर केवळ ७४ टक्के जनताच साक्षर झाली. तीही केवळ आपले नाव लिहिता येतेय या निकषावर. शासननिरपेक्ष शिक्षण व्यवस्था आणि सरकारी व्यवस्था यांच्यातील हे मुख्य अंतर आहे.
         स्वातंत्र्यानंतर ही शिक्षणव्यवस्था बदलून खऱ्याअर्थी 'स्व'चे तंत्र निर्माण करणारी शिक्षणव्यवस्था लागू करण्यात येईल  अशी अपेक्षा होती. मात्र ज्यांच्या हातात शासनाची सुत्रे होती ते लोक दिसायला तर भारतीय होती मात्र मनाने पूर्णतः इंग्रजाळलेली होती. या मेकॉले पुत्रांनी स्वतःच्या कर्तुत्वाने आपण मेकॉलेपुत्र असल्याचे सिध्द केले. १९९१ साली जेव्हा खासगीकरणाची चर्चा झाली तेव्हा शिक्षणक्षेत्राचेही खासगीकरण झाले. परंतु हे केवळ शिक्षणाचे व्यापारीकरण होते. यातील सरकारी नियंत्रण सातत्याने वाढतच गेले. इथे लुटीलाच स्वातंत्र्य आहे. या खासगीकरणामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे शोषण वाढले. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाचा हस्तक्षेप आणखी वाढला. त्यामुळे अनेक नियामक मंडळांची निर्मिती झाली. यात शिक्षणाचा स्तर वाढण्याऐवजी भ्रष्टाचार अधिक बोकाळला. शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराने आज परिसीमा ओलांडली आहे. सर्व स्तरावर गुणवत्तेचा ऱ्हास झाला आहे. यावर जर का वेळीच उपाय केला गेला नाही तर १० वर्षात आपण शिक्षित मुर्खांचा देश होऊन जाऊ.
   शासन निरपेक्ष शिक्षणच गुणवत्तापूर्ण आणि सर्वव्यापी असू शकते. शासन निरपेक्ष म्हणजे खासगीकरण नाही. खासगी व्यापाऱ्यांच्या हाती शिक्षणाची सुत्रे सोपविणे त्यावर उपाय नव्हे. गेल्या पंचवीस वर्षाच्या अनुभवाने आपण सांगू शकतो की, खासगीकरणाने फायदा सोडाच पण नुकसानच अधिक झाले. असं असलं तरी दुसरीकडे सरकारी खात्यात कामाचा अभाव पाहायला मिळतो. कामाच्या ठिकाणी टाळाटाळच अधिक पाहायला मिळते. आज सर्वत्र पाठ्यक्रम मंडळात शासकीय नियंत्रणच अधिक आहे. विविध परवानग्यासाठी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होताना पाहायला मिळतो. आज अनेक कुलगुरू राजकीय नेत्यांसमोर तसेच शासकीय अधिकाऱ्यांसमोर लाचार होताना दिसतात. आपल्याकडे धनाची कमतरता नाही मात्र चुकीच्या धोरणामुळे हा पैसा वाया जातोय. त्यामुळे देशातील संशोधन आणि नाविन्यतेचा शोध पूर्णपणे ठप्प झाल्याचे पाहायला मिळतोय. नव्या सरकारकडून तरी यात बदल व्हावेत ही अपेक्षा आहे.
वास्तविक पाहता आवश्यकतेनुसार नव्या पिढीला व्यावहारिक शिक्षण देण्याची जबाबदारी समाजाची आहे सरकारची नाही. आजही अनेकांकडून आदर्श शिक्षण संस्था चालविल्या जातात. आजच्या शिक्षण संस्थांचे अर्थकारणही समाजच पाहू शकतो. मात्र आज ज्याप्रकारे शासन सर्वव्यापी झालेय ते पाहता पुढील काही दशके शिक्षणाचा सर्व आर्थिक भार शासनावरच असेल. शिक्षणाचे नियमन, नियंत्रण तसेच त्याचे संचलन स्वतंत्र असायला हवे. अन्यथा ते प्रभावी राहणार नाही. स्वायत्ततेचा निर्णय सरकारलाच करायचा आहे. आपले अधिकार कमी करण्याचा निर्णय शासनालाच घ्यायचा आहे. यात राजकीय इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. अशी इच्छाशक्ती एक तर वैचारिक स्पष्टतेतून येते किंवा लोकशाहीतील जनमताद्वारे येते. त्यामुळे दोन्ही स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे.
     सध्यस्थितीत शासन निरपेक्ष शिक्षण व्यवस्था देशात कशाप्रकारे रूजवता येईल याचा विचार करणे क्रमप्राप्त आहे. यासाठी पहिले पाऊल म्हणून शिक्षणाला राष्ट्रीय स्तरावर समग्रतेने संचालित करण्यासाठी स्वतंत्र शिक्षण आयोगाची स्थापना करावी लागेल. सध्यस्थितीत प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक पध्दतीने शिक्षण दिले जातेय. याशिवाय अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र, कृषि तसेच शारिरीक शिक्षणाचे कोर्सेस चालवले जातात. यासर्व क्षेत्रातील शिक्षणाकडे समग्रतेने  पाहण्याची जबाबदारी या आयोगाकडे द्यावी लागेल. यातूनच समग्र शिक्षण पध्दतीचा विकास होणे शक्य आहे. तसेच अशाप्रकारचे आयोग राज्य आणि जिल्हा स्तरावर स्थापन करावे लागतील. मात्र हे आयोग पूर्णतः राजकारणापासून आणि प्रशासकीय व्यवस्थेपासून अलिप्त असायला हवी. शिक्षण विभागाचे अधिकारी तसेच मंत्री देखील या आयोगाच्या अंतर्गत असावेत. समाजातील सर्व क्षेत्रातील योग्य, प्रतिष्ठित व प्रामाणिक व्यक्तिंनाच याचे प्रतिनिधित्व द्यावे. शिक्षणाचे संचालन, आयोजन, नियमन तसेचे नियंत्रणाची संपूर्ण जबाबदारी या आयोगाकडे असावी. शिक्षणाला समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत लागू करणे, क्रमशः पाठ्यक्रम निश्चित करणे, अधिकारीवर्गाची नियुक्ती अशा सर्व प्रकारच्या कार्याचे विकेंद्रीकरण जीतक्या जास्त प्रमाणात कराल तितका समाजाला उपयोगी अशा शिक्षण व्यवस्थेचा विकास करता येईल. तसेच यासाठी व्यापाऱ्यांच्या उत्पन्नातील २ टक्के भाग याच्या अर्थकारणासाठी असावा. तसेच समाजातील विविध स्तरातून यासाठीचे अर्थकारण निर्माण व्हावे. राजस्थानात भामाशाह योजनेअंतर्गत शासकीय शाळांच्या विकासासाठी तेथील समाजाने मोठी जबाबदारी हाती घेतलीय. पाली जिल्ह्यातील सर्व विद्यालयातील फर्निचर तसेच अन्य साधन सामग्रीचा खर्च या योजनेतून पूर्ण केला आहे. शिक्षक आणि सेवकांच्या मानधनाचा खर्चही यातूनच केला जातो. त्यामुळे शासन निरपेक्ष शिक्षण व्यवस्था प्रत्यक्षात उतरविणे अशक्य नाही. जर का अशा प्रकारच्या शिक्षण पध्दतीचा अवलंब आजपासून सुरू केला तर प्रगत राज्यात पुढील १० वर्षात आणि देशात पुढील २५ वर्षात पूर्णपणे प्रत्यक्षात येऊ शकेल. अशाप्रकारे शासन निरपेक्ष स्वायत्त शिक्षण व्यवस्था निर्माण झाली तर मनुष्यनिर्माण करणारी शिक्षण व्यवस्था निर्माण होईल.
(पूर्व प्रसिद्धी - दैनिक पुढारी, ३ जानेवारी २०१६ )
सागर सुरवसे
सोलापूर
मोबा : ९७६९१७९८२३ / ९६६५८९९८२३ 
Email: sagar.suravase@gmail.com 

Tuesday 15 September 2015


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेतील 'सिलिकॉन व्हॅली' मध्ये होणा-या भाषणाला तेथील डाव्या विचारधारेच्या गटाने विरोध केला आहे. अर्थात या पुर्वीही अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे झालेल्या भाषणालाही त्यांनी विरोध केला होता. मात्र यंदाचा हा विरोध थोडा अधिक तीव्र आहे. कारण मोंदींचे भाषण हे सिलिकॉन व्हॅलीत होत आहे. सिलिकॉन व्हॅली हे अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्को शहरातील सर्वात महत्त्वाचे ठिकाण आहे. कारण अमेरिकेत जेवढी गुंतवणूक होते त्यापैकी 1/3 (एक तृतीअंश) गुंतवणूक ही या सिलिकॉन व्हॅलीत होते. पुर्वी येथे सेमी कंडक्टर चीप बनविण्यात येत असे. त्यात या भागात सिलिकॉन वापरण्यात येत होते. त्यावरून त्याचे नाव सिलिकॉन व्हॅली असे पडले. मात्र हे नाव एका पत्रकाराने लिहिलेल्या लेखमालेला देण्यात आले होते. त्यावरून सिलिकॉन व्हॅली असे याचे नामकरण करण्यात आले. डोनल्ड हेफलर असे या पत्रकाराचे नाव होते.

जगातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्या म्हणजे गूगल, याहू, फेसबूक, इंटेल, ओरॅकल या कंपन्यांची मुख्यालये याच व्हॅलीत आहेत. कम्प्युटर, व्हिडिओ गेम, एलसीडी अशी शेकडो उत्पादने या सिटीत तयार होतात. इथे सरकार तर्फे मिळणारे वीजेचे अनुदान, स्वस्त इंटरनेट, चांगली प्रतिमा यामुळे इथे झटक्यात गुंतवणूक होते. नवीन उद्योगांना स्थिरस्थावर होण्यासाठीचे हे एक उत्तम शहर आहे. 1960 साली उथे 18 हजार कामगार कार्यरत होते आज ती संख्या 29 लाख 70 हजार लोक कार्यरत आहेत. येथील कर्मचा-याचे सरासरी वेतन 6 लाख 38 हजार इतके आहे. जगातील सर्वात जास्त वेतन देणारे ठिकाण म्हणजे सिलिकॉन व्हॅली आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांचे दरमहा वेतन 25 कोटी 16 लाख इतके आहे तर याहूच्य सीईओ मेरिस मेयर यांचे मसिक वेतन 64 कोटी इतके आहे.
भारतीयांच्यासाठी गौरवाची बाब म्हणजे येथील 50 टक्के कंपन्यांचे नेतृत्त्व भारतीयांच्या हाती आहे. 89 हजार भारतीय लोक येथे काम करत आहेत. गुगलचे सुंदर पिचई, सत्या नाडेला, रश्मि सिन्हा, विनोद खोसला आदी भारतीयांनी आपला दबदबा येथे राखला आहे.
तर अशा या सिलिकॉन व्हॅलीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र यांचे भाषण होणार आहे. जवळपास 50 हजारहून अधिक लोक या भाषणाला उपस्थित असणार आहेत. मात्र भारतीयांसाठी अभिमानास्पद अशा या भाषणावर देशातील काही मंडळी टीका करत आहेत. तसेच काही आऊटडेटेड विचारधारेचे लोक याला विरोध करत आहेत. असो ज्याने त्याने आपले काम करावे, मात्र डाव्या, ऊजव्यांनो देशासाठी आतातरी एकत्र या! कारण अमेरिकेतील मोदींच्या भाषणानंतर तेथील लोक विचारतील, "हू इस दीस पर्सन?" तेव्हा तेथील भारतीय अभिमानाने सांगतील, "आमच्या देशाचे पंतप्रधान..."

सागर सुरवसे, 
9769179823
Follow on Twitter :  @sagarsurawase


संदर्भ : दै. भास्कर

    अंदमान येथे झालेल्या ४ थ्या विश्व साहित्य संमेलनाच्या निमित्ताने देशातील विचारधारेच्या वर्तुळात चांगलीच वैचारिक घुसळण झाल्याचे पाहायला मिळाले. या निमित्ताने अनेक कुमार विचारवंतांना आपल्या सुमार बुध्दीचे दर्शन घडविण्याची संधी शेषराव मोरे सरांनी उपलब्ध करून दिली. अर्थात अनेक वर्षे बिळात बसलेल्या नव्हे नव्हे लोकांनी बसवलेल्या भूजंगांना आता परत फुत्कार सोडायची  सुरूवात प्रा. मोरे सरांनी उपलब्ध करून दिली. तेही एक बरेच झाले. कारण ज्या तथाकथित ज्येष्ठाना लोक खूप मोठे विचारवंत मानत होते त्यांच्या बुध्दीची 'पातळी' (सुटत आहे) कळून येत आहे. कुमार सप्तर्षी सारख्यांची असलेली जुनी ओळख पुसून सुमार सप्तर्षी अशी होत आहे.
     असं म्हणतात, एखादी व्यक्ती व्यक्ती वा संघटना जेव्हा सर्वोच्च शिखरावर पोहोचते तेव्हाच त्याची घसरण सुरू झालेली असते. सप्तर्षींच्या बाबतीतही तिच गत आहे. अर्थात त्यांची घसरण होऊन बराच काळ लोटला. आजच्या पिढीला सप्तर्षी कोण हे माहितही नाही. मात्र त्यांच्या 'युक्रांदी'य कारकिर्दीविषयी थोडेफार माहिती असलेल्यांनाही त्यांच्या अपयशाचे गुपित एव्हाना कळले असेल.
विशेष म्हणजे हे कळण्याला त्यांचे प्रा. शेषराव मोरे यांच्याविरोधातील लेखच पुरेसे ठरलेत.
      दै. सकाळ, लोकमत या वृत्तपत्रातून त्यांनी गेल्या आठवडाभरात शेषराव मोरे सरांवर बरेच विषारी नव्हे तर विखारी फुत्कार सोडलेत. मात्र त्यातून ते निश्चित अशा निष्कर्षाप्रत पोहोचू शकले नाहीत. लोकमत मधील मंथन पुरवणीतील लेखाच्या सुरूवातीलाच ते लिहितात की, "असे म्हणतात की, सत्ताबदलाची चाहूल साहित्यिकांच्या लिखाणातून येते. रशियन क्रांतीची चाहूल टॉलस्टॉय, चेकॉव्ह वगैरेंच्या लेखनातून लागली होती. तंत्रज्ञानाचा आधार घेऊन हुकुमशाही येण्याची शक्यता, मग ते कम्युनिस्ट असो वा धर्मांध असोत, जॉर्ज ऑरवेलच्या कादंबऱ्यामधून व्यक्त झालेली दिसते. सध्याचे केंद्र सरकार कोणत्या विचारधारेचे आहे व ते कोणत्या दिशेने प्रवास करीत हुकुमशाहीचा टप्पा गाठेल याची चाहूल अंदमान येथे झालेल्या तथाकथित विश्व साहित्य संमेलन आणि त्याचे अध्यक्ष शेषराव मोरे यांच्या वाणीला फुटलेल्या धुमा-यातून लागते. तसे पाहिले तर नांदेडवासी शेषराव मोरे यांना कुणी विचारवंत मानत नाहीत. तरीही हुकुमशाहीचा सूर्य उगवणार आहे, हे कोंबड्याप्रमाणे ते आरवले."
   सप्तर्षी यांच्या वरील उताऱ्या तून त्यांच्या बुध्दिची कीव करावी तेवढी कमीच वाटते कारण, एकीकडे ते म्हणतात की, सत्ताबदलाची चाहूल साहित्यिकांच्या लिखाणातून येते, मात्र वास्तवात देशात सत्ताबदल होऊन वर्ष लोटले आहे. त्यामुळे मोरे यांना सत्ताधा-यांचे भाट ठरविण्याचा सप्तर्षी यांचा युक्तीवाद पहिल्याच वाक्यात फोल ठरतो. त्यावरून त्यांच्या लिखाणात किती विखार आहे हे स्पष्ट होते. वरील उताऱ्यात केंद्र सरकार कसे हुकुमशाहीकडे जाणार आहे हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात आणि खाली तेच सांगतात की, मोरे कोंबड्याप्रमाणे आरवले. या दोन्ही आरोपातून त्यांच्या सुमार बुध्दीचे दर्शन घडते. वर कढी म्हणजे, मोरे यांना कोणी विचारवंत मानत नाही असे ते म्हणतात तर मग, सप्तर्षी यांनी हा लेखनप्रपंच का केला? याचे उत्तर त्यांनी द्यावे.
      पुढे ते लिहितात, मोरे हे कुरूंदकरांच्या कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून लागले तेव्हापासून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच परिचय आहे.  त्याचा दाखला देत सप्तर्षी कुरुंदकरांच्या बुध्दिचा अर्धा भाग दलित व मुस्लिम या जनसमूहाबद्द्ल प्रतिगामी होता असे सांगतात. मग जर का त्यांच्या बुध्दिचा भाग अर्धा प्रतिगामी होता तरीही सप्तर्षी हा मुद्दा सोडून त्यांना पुरोगामी मानत होते. त्यामुळे तुमच्या या मोरेंबद्दलच्या लेखाला वाचकांनी नक्की काय मानायचे? पुरोगामी की प्रतिगामी?
     पुढे जाऊन या लेखात सप्तर्षी कुरुंदकरांबाबत म्हणतात, "मराठवाड्यातील लोकांमध्ये मुस्लिमांइतकाच दलित द्वेषही ठासून भरलेला आहे. कारण दलित लोक रझाकारांना गावातील श्रीमंतांचे घर दाखवित. मग रझाकार त्यांचे घर लुटीत. रझाकारांनी अत्याचार केले ही गोष्ट खरीच होती. त्यामुळे कुरुंदकर ही गोष्ट विसरायला तयार नव्हते. ती गोष्ट सोडता कुरुंदकर पुरोगामी होते."
सप्तर्षी यांचा हा युक्तिवाद किती बालिशपणाचा आहे हे लक्षात येते. जर का कुरुंदकारांच्या बुध्दिचा एखादा भाग प्रतिगामी मानून सप्तर्षी त्यांना मानत असतील तर मग मोरे यांच्याबाबतीतच आकस का? सप्तर्षी त्यांच्याबाबतीतही आपला उदात्तपणा का दाखवत नाहीत? एकंदरीतच काय तर, कुरूंदकरांच्या नावावर आपल्या सोयीच्या विचारांचे अपहरण करून आपली दुकानदारी चालवायची आणि ज्यामुळे दुकानदारी धोक्यात येईल असे वाटते तिथे सोयीस्कर पळवाट शोधायची असाच प्रताप सप्तर्षी आपल्या लिखाणात धादांतपणे करतात. वर शेषराव मोरेंना शहाणपणा शिकवतात की, "सत्यनिष्ठा बाळगायची नाही, ही भूमिका असते."
      पुढे ते शेषराव मोरेंच्या ग्रंथ संशोधन आणि लेखन कार्याकडे वळतात. एखाद्या सत्यनिष्ठ विचारवंताचा तेजोभंग कसा केला जातो याचे हे मुर्तीमंत उदाहरण आहे. " शेषरावांनी 'गांधीजींना देशाची फाळणी हवी होती' असा निष्कर्ष आधी काढला. त्याला विक्री मुल्य होते. आपल्या निष्कर्षाच्या सन्मानार्थ त्यांनी ७०० पानांचा ग्रंथ लिहिला. हिंदुत्त्ववाद्यांचे मार्केट असल्याने प्रकाशकाने तत्परतेने तो प्रकाशित केला. चांगली कमाई झाली. मी त्या ग्रंथातील प्रत्येक शब्द न शब्द वाचलेला आहे. कुठेही गांधींना फाळणी हवी होती असा निष्कर्ष काढता येत नाही. सर्व काही मोघम व अनुमान पध्दतीचे प्रतिपादन आहे. शिवाय भाषाशैली अत्यंत कंटाळवाणी आहे."
  वरील उताऱ्यात सप्तर्षींचा मोरे यांच्याबद्दलचा आकस दिसून येतो. कारण यांना मोरेंचा पुस्तकातील तर्कवाद मान्य नाही. मग लेखाच्या सुरूवातील हेच सप्तर्षी महाशय जॉर्ज ऑरवेलच्या कादंब-यांतील दाखला देतात मग मोरेंच्या तर्कवादाबाबतचा त्यांचा आकस नक्की कितपत योग्य वा न्याय्य आहे? राहता राहिला प्रश्न 'कॉंग्रेस आणि गांधींनी अखंड भारत का नाकारला? ' या पुस्तकाचा. तर सप्तर्षी यांचा दावा आहे की मोरेंनी हा ग्रंथ केवळ हिंदुत्त्ववाद्यांना पुरक असाच लिहिला आहे. वर ते ते म्हणतात मी या ग्रंथातील शब्द न शब्द वाचलाय. मात्र त्यांनी हा ग्रंथ खरच वाचला आहे का? याबाबत माझ्या मनात शंका आहे. कारण ज्या कोणी हा ग्रंथ वाचला असेल त्यांच्याही मनात हा लेख वाचून प्रश्न चिन्ह उभारला असेल की, खरच सप्तर्षींनी हा ग्रंथ वाचलाय का? कारण हा ग्रंथ हिंदुत्त्ववाद्यांना पुरक असा मुळीच नाही. केवळ नावावरूनच त्यांनी ग्रंथाबाबत निष्कर्ष काढला असावा अशी दाट शंका माझ्या मनात आहे. वास्तविक पाहता शेषराव मोरे यांच्या इतपत, भारताच्या फाळणीबाबतचे सेक्युलर विश्लेषण करणारी भूमिका आजवर कुणी मांडली नसावी. ते ही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा कट्टर समर्थक असूनही. त्यामुळे सप्तर्षींनी मोरे यांच्या लिखाणाबाबत शंका घेवूच नये. खरे तरे मोरे यांच्यासारखी माणसे तर्कवादी लेखन करून सत्य जगासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांच्या लिखाणामुळे सप्तर्षींसारख्या वैचारिक दुकानदारांची दुकानदारी बंद पडू लागल्यानेच असा विरोध वा तेजोभंग करण्याचा केविलवाणा प्रयत्न होताना दिसत आहे.
       या उपरोक्त कुमार सप्तर्षी यांनी आपल्या लेखात बऱ्याच सुमार दर्जाचे युक्तिवाद मांडण्याचा वृथा प्रयत्न केला आहे. आपण कसे पुरोगामी आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करताना ते किती जातीयवादी आहेत हे त्यांच्या लेखातून दिसून येते. प्रत्यक्ष जीवनातही ते पुरोगामीत्वाचा बुरखा पांघरून थोडा स्पार्क असणाऱ्या तरूणांना त्याची जात विचारतात. आणि जर का त्याने सांगितली नाही तर ते त्याच्या कुटुंबीयांना गाठून त्याची जात काढून घेतात. त्यामुळे इतका जातीयवादी माणूस इतरांच्या पुरोगामीत्वावर शंका घेतो हेच मुळी हास्यास्पद आहे. सप्तर्षींच्या या लेखनप्रपंचावरून एकच गोष्ट मनात येते की,
बहि-यांची जमवूनी मैफिल तो दाद लाटतो आहे,
अंधांच्या वस्तीत आरसे व्यर्थ वाटतो आहे.
      
- सागर सुरवसे.
९७६९१७९८२३
Follow on Twitter : @sagarsurawase 


Saturday 6 June 2015



पुण्याहून मुंबईला निघालो होतो. सकाळचे 7 वाजले होते. एक नंबर फलाटावर डेक्कन क्वीन लागली होती. लगबगीन बोगी नंबर 5 जवळ गेलो मात्र बोगी फूल झाली होती. 6, 7 नंबरमध्येही तीच स्थिती. त्यामुळे 8 नंबर बोगीमध्ये शिरलो. ही बोगी ब-यापैकी मोकळी होती. अर्थात ही मोकळीक पाहूनच मनात शंकेची पाल चुकचुकली. डब्यात प्रवेश करताच अनेकांच्या तिरस्कारयुक्त नजरा माझ्याकडे  रोखल्या गेल्या. 'आली आणखी एक ब्याद' असेच काहींचे चेहरे झाले. हे सर्व पाहिल्यावर आपण कोणत्यातरी स्पेशल डब्यात शिरल्याचे जाणवले. घडलंही तसंच होतं. कारण मी ज्या डब्यात प्रवेशलो होतो तो रोज पुणे-मुंबई-पुणे असा प्रवास करणा-या चाकरमान्यांचा होता. अर्थात ते सर्व चाकरमाने त्या डब्याला आपली जहागीर मानतात आणि स्वत:ला त्यातील युवराज!
डब्यात चढून माझी बॅग लगेज स्टॅंडवर ठेवतो तोच एकाने हटकले, "तुमची बॅग तिकडे ठेवा".
मी लगेच प्रतिप्रश्न केला, "का? जागा विकत घेतलीय का?"
"अरे तुला नीट सांगतोय ना; ऐक की," तो उत्तरला.
मी म्हटलं'"कारण सांगा?"
त्यावर तो शांत झाला.
स्पेशल डब्यात चढल्याबद्दलचा हा दुसरा उघड विरोध होता. आपल्या अधिकाराची जाणीव असल्याने डगमगलो नाही. थोड्याच वेळात जी सीट रिकामी होती तेथे बसणार तितक्यात एकाने विरोध सुरू केला... "येथे बसायचे नाही. ही पासधारकाची जागा आहे. पुढच्या डब्यात चालायला लागायचं."
तो ज्या आवेशाने बोलला त्याच्याहून अधिक आवेशपूर्ण आवाजात बोललो, "रेल्वे काय बापाची आहे का? की खरेदी केलीय? व्हय रे भडव्या. औकादीत राहा. तू कोण मला सांगणारा?...सरक तिकडे."
माझ्या या बोलण्याने तो जाग्यावरून उठला. "शिव्या देतो काय" म्हणत अंगावर आला. तोच मी पण बाह्या सरसावल्या आणि अंगावर गेलो. तोच आजूबाजूच्या प्रवाशांनी मध्यस्ती करत भांडण सोडवले. त्यानंतर तेथील सर्वांनी मला उपदेशाचे डोस आणि नैतिकतेचे धडे द्यायला सुरूवात केली.
सर्वांकडे दुर्लक्ष करत चेह-यावर माजूरडेपणाचा भाव आणत मी सीटवर बिनदिक्कतपणे बसलो. त्यानंतर मला कोणी विरोध केला नाही. तोवर सर्व ठीक होते. पुढच्या काही मिनिटातच यांच्या मुजोरवृत्तीने जोर पकडला. ज्या प्रवाशांनी तिकिट काढले होते त्यांना ते डब्यात प्रवेश नाकारू लागले. जे पासधारक नव्हते त्यांना या टोळक्याने अक्षरश: धक्के देऊन पुढच्या डब्यात पिटाळले. यांची मुजोरी एवढ्यावर न थांबता त्यांनी दोन बोगीमधील शटर बंद करून घेतले. वास्तविक पाहता पासधारक हेदेखील प्रवाशीच असतात. त्यांना हा अधिकार दिला कोणी? हे काम टिसीचे आहे. मात्र या लोकांचे संघटन इतके असते की हे सहजपणे एकाद्याला बाहेर काढतात. रेल्वे प्रशासन नावाचे बांडगूळ मात्र यावर काहीच भूमीका घेत नाही. ही मुजोरी थांवलीच पाहिजे.
गाडी सुटायला काही मिनिट असताना दोन पासधारक गाडीत चढले. आश्चर्य म्हणजे या पासधारकांनादेखील या कंपूने बसायला विरोध केला. आमच्याकडे जागा नाही. आमचा माणूस येणार आहे. त्यातील एकाने मात्र विरोध करत ठाण मांडली. अन्यायाची मनस्वी चीड असल्याने या लोकांचा प्रचंड संताप आला होता. हाताच्या मुठी पिळल्या होत्या. माझी ही स्थिती दादरला पोहोचेपर्यंत तशीच होती.
विशेष म्हणजे शिवाजीनगर स्टेशन पार करायच्या आतच या कंपूने पत्त्याचा डाव मांडला आणि जुगार सुरू केला. तो शेवटपर्यंत सुरू होता. हा सर्व प्रकार पाहून वाटले, 'ही तर जात पंचायतच आहे.' दादरला उतरल्यानंतर रेल्वेतील सर्व प्रकार 1 नंबर फलाटावरील जनरल मॅनेजरच्या कानावर घातला. मात्र नेहमीप्रमाणे आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. अशा प्रकारांना केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेशजी प्रभू आणि त्यांचे रेल्वे प्रशासन कसा आळा घालणार हा यक्ष प्रश्न आहे. रेल्वेतील पासधारकांची मुजोरी थांबलीच पाहिजे.


Sunday 31 May 2015



वडार समाज. एक असा समाज, जो समाजातील इतर घटकांना ऊन, वारा, पाऊस यापासून वर्षानुवर्षे संरक्षण देण्याचे कार्य इमाने-इतबारे करत आहे. तेही विना तक्रार. गावगाड्याच्या व्यवस्थेत वडार समाजाकडे दगड घडवण्याचे व मानवाच्या मुलभूत गरजांपैकी एक गरज भागवण्याचे म्हणजेच निवारा बांधून देण्याचे कार्य आले. कोणतीही तक्रार न करता त्याने ते स्वीकारलेही. त्याच्या या व्यवसायात गडकोट, चिरेबंदी वाडे, मंदिरे यांच्या निर्मितीसह दगडखाणीतील दगड फोडण्याचे कार्यही तो पिढीजात व्यवसाय म्हणून करत आला आहे. आजही ती स्थिती कायम आहे. मुळातच शिक्षणाचे वातावरण न लाभल्याने त्यांची पुढची पिढीदेखील त्याच व्यवसायात राहिली.

आपल्या अंगमेहनतीने अशक्यप्राय वाटणारे डोंगरच्या डोंगर सहजपणे पोखरून काढणार्‍या या समाजाचे अंतरंग वडार समाजातीलच एक युवक जेव्हा समाजासमोर आणतो, तेव्हा संवेदनाहीन होत चाललेल्या समाजाच्या डोळ्यावरची झापडं सर्रर्र..दिशी बाजूला होतात. नव्हे नव्हे ती व्हायलाच हवी. डोंगर पोखरताना किंवा मोठमोठ्या इमल्या बांधताना अनेक वडार बांधवांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्याच्या गेलेल्या प्राणाचा मोबदला मात्र त्याला मिळतोच असे नाही. अर्थात प्राण ही अमूल्य गोष्ट असली तरीही त्याच्या मृत्यूने कुटुंबाचा आधारवड गेलेला असतो. त्याचा किमान मोबदला आर्थिक स्वरूपात त्याच्या कुटुंंबीयांना मिळायलाच हवा, परंतु वास्तव काही वेगळेच असते. त्या आधारवडाच्या पश्‍चात कुटुंबीयांची इतकी वाताहत होते की, त्या वाताहतीच्या नुसत्या कल्पनेनेच आपण खचून नेस्तनाभूत होऊ.

‘दगडखाणीतील उद्ध्वस्त आयुष्य’ या सत्य घटनेवर आधारीत असलेल्या कादंबरीत वरील सर्व स्थित्यंतरं लेखकाने ताकतीने मांडली आहेत. हणमंत कुराडे या युवा कादंबरीकाराचे वय पंचविशीतले असले तरी त्याचे अनुभवविश्‍व आणि निरिक्षण शक्ती मात्र प्रगल्भ आहे. त्याने आपल्या कादंबरीत शब्दबध्द केलेल्या गोष्टी या केवळ कल्पनाविलास नसून सत्य घटनेवर आधारित आहेत. याशिवाय केवळ सत्य घटना आहे म्हणून त्या कादंबरीचे महत्त्व वाढते असे नाही तर, लेखकाने ज्या शैलीत आणि मोजक्या शब्दात आपल्या समाजाचे वास्तव मांडले आहे, त्यासाठी केवळ प्रतिभा ही एकच गोष्ट असावी लागते. ती कुराडे यांच्याकडे आहे.

 
वडार समाज हा आजही पिचलेल्या अवस्थेतच आहे. वडार समाजातील काही उच्चभ्रू लोकांनी आपल्या हिंमतीवर स्वत:चा विकास साधला आहे. त्यासाठी त्यांचे कौतुकच आहे, पण समाजाचे म्हणून   आपण काही तरी देणे लागतो ही भावना त्यांच्यामध्ये अजूनही रूजलेली नाही. मुळात हा समाज तसा पाहिला तर कमीच आहे. मात्र तरीही त्यांच्यासाठी म्हणून कष्ट घेण्यास कोणीही पुढे सरसावताना दिसत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या विद्वत्तेचा उपयोग दलित समाजासाठी केला. त्यात वावगे असे काहीच नाही. कारण त्या समाजाला वर आणण्यासाठी त्यातील नेमक्या उणिवा काय आहेत हे त्या समाजातील व्यक्तिच चांगल्या पद्धतीने जाणू शकतात. बाबासाहेबांना ही जाण होती, त्यामुळेच ते दलित समाजासाठी भरीव असे कार्य करू शकले. आजच्या घडीला मात्र तसा एकही दलित नेता डोळ्यासमोर नाही. वडार समाजाचीही तीच अवस्था आहे. कुराडे यांनी या कादंबरीच्या माध्यमातून ही वडार समाजातील सत्यस्थिती मांडली आहे. त्यांच्या लिखाणामुळे समाजातील इतर लोकांना यातील वास्तव माहिती होण्यास निश्‍चितच मदत होईल. वडार समाजात आजमितीला प्रचंड समस्या आहेत. यातील मुख्य म्हणजे शिक्षणाचा अभाव. मात्र प्रस्तुत कादंबरीतील नायक हा शिक्षणाच्या क्षेत्रात नेत्रदीपक अशी कामगिरी करताना पहायला मिळतो. लेखकाला त्याच्या समाजातील नेमक्या समस्या कळल्यानेच तो आपल्या नायकाला एक प्रेरणास्त्रोत बनवू इच्छितो. त्याचे हे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. लेखक आपल्या समाजातील समस्या कृतिशीलपणे सोडविण्यासाठी विविध संघटनांमध्ये कार्यरतही आहे.

या कादंबरीला प्रस्तावना लाभली आहे ती, अमर कुसाळकर या हरहुन्नरी माणसाची. अतिशय मार्मिक शब्दात लिहिलेली प्रस्तावना ही या कादंबरीला आणखी बळ देऊन जाते. कादंबरीतील एक प्रकरण तर खूपच ताकतीचे झाले आहे. अगदी मोठमोठ्या लेखकांची सुट्टी करेल असे ते प्रकरण आहे. कादंबरीचा नायक गोपू हा वसतीगृहात रहायला जातो. त्यावेळी त्याच्या मित्रासह त्याला स्पेशल जेवणाचा बेत करायचा असतो. मात्र तो बेत करताना नायकासह त्याच्या मित्रांचे जे हाल आणि गमती-जमती होतात; ते लेखकाने कादंबरीत इतक्या ताकतीने मांडले आहेत की, शालेय अभ्यासक्रमात त्याची निवड झाल्यास वावगे ठरू नये. हे प्रकरण वाचल्यानंतर आमच्या शालेय जीवनातील मराठीच्या पाठ्यपुस्तकातील ‘विजेचा दिवा’ धड्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

लेखकाने, वडार समाज नक्की कसा आहे? त्याची संस्कृती काय आहे? त्याच्या समस्या, त्याची बलस्थानं आणि कमकुवतपणा कशात आहे, या सर्वाचे एक विलक्षण दर्शन ‘दगडखाणीतील उद्ध्वस्त आयुष्य’ या कादंबरीतून मांडले आहे. त्यामुळे वडार समाजातील बांधवांसह इतर लोकांनीही ती आवर्जून वाचायलाच हवी. ‘चपराक प्रकाशन’सारख्या संस्थेचे त्यासाठी आभारच मानायला हवे कारण अशा विषयांवरची पुस्तके प्रकाशित करून समाजातील आपली जबाबदारी किती महत्त्वाची आहे याचे दर्शन ते घडवतात. विशिष्ठ जातीचे ते पुस्तक आहे, असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष न करता, त्यातील वास्तव समाजासमोर आणण्याचे धाडस ते दाखवतात. युवा कादंबरीकार हणमंत कुराडे याचे हे पहिलेच पुस्तक आहे, मात्र एखाद्या कसलेल्या कादंबरीकाराप्रमाणे त्याची लेखणी चालते. इथे मुद्दामहून कोणत्याही कादंबरीकाराशी कुराडेंची तुलना करत नाही, कारण दोन प्रतिभावान व्यक्तींची तुलना कधीच करता येत नाही. त्यांच्या भावी लेखन कार्यास शुभेच्छा..!

दगडखाणीतील उद्ध्वस्त आयुष्य
लेखक : हणमंत कुराडे
प्रकाशक : 'चपराक प्रकाशन', पुणे
पुस्तकासाठी संपर्क : ७०५७२९२०९२ / ०२०-२४४६०९०९
पृष्ठ संख्या : ८०   मूल्य : ७५ रू. 

सागर सुरवसे
9769179823

Follow on twitter: @sagarsurawase  

(लेखाची पूर्व प्रसिद्धी- साप्ताहिक 'चपराक', पुणे - २५ मे २०१५ )


Monday 18 May 2015



भारतीय जनता कधी कोणाला डोक्यावर घेईल आणि कधी कोणाला खाली आपटेल याचा नेम नाही. गेल्या वर्षभरापूर्वी भारतीयांनी एका चहावाल्याच्या मुलाला देशाच्या सर्वोच्च स्थानी बसवून लोकशाहीची ताकद दाखवून दिली होती. त्यानंतर मात्र आजची परिस्थिती काय आहे? तर सर्व समाजमाध्यमातून त्याच सर्वोच्च स्थानावरील व्यक्तिवर टीकेची झोड उठविली जात आहे. ती स्वाभाविक आहे. कारण त्यांना दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता झालेली नाही. मात्र ती वर्षभराच्या कार्यकाळात होणे खरच शक्य आहे का? हा विचार होणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या वर्षभराच्या कार्यकाळात कोणत्या महत्त्वाच्या योजना आणल्या? ज्या जुन्या योजना होत्या त्याला कशाप्रकारे उर्जितावस्था प्राप्त करून दिली? जे काम वर्षभरात झाले, तसे काम या आधीच्या कोणत्या सरकारने केले होते काय? गेल्या वर्षभरात मंत्र्यांची भ्रष्टाचाराची किती प्रकरणे समोर आली? यावर सारासार सामुहिक चर्चा होणे महत्त्वाचे ठरले असते. किंबहुना विरोधी पक्षाच्या किती नेत्यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने सरकारच्या त्रृटी दाखवण्याचा प्रयत्न केला? याचे उत्तर दुर्दैवाने नाही असेच म्हणावे लागेल. कारण ऐतिहासिक पराभवामुळे आलेले नैराश्य आणि अस्तित्त्वाचा प्रश्‍न यामुळे विवेक हरवून बसलेले विरोधक वेगळ्याच स्थितीत पोहचले आहेत. केवळ आणि केवळ दिशाभूल हाच एककलमी कार्यक्रम सध्या विरोधकांनी राबवला आहे. त्यात भूमि अधिग्रहण विधेयक आणि पंतप्रधानांचा परदेश दौरा हे मुद्दे प्रामुख्याने छेडले जात आहेत. याचाच परिणाम म्हणून आज समाजमाध्यमात मोदींवर विनोद, टीका सर्वकाही सुरू आहे. खासकरून मोदींच्या परदेशवारीवरून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. मात्र या टीकेला खरच काही आधार आहे का?
मोदींनी वर्षभराच्या कार्यकाळात जवळपास 18 देशांचे दौरे केले आहेत. कदाचित वर्षभरात इतके यशस्वी परदेश दौरे करणारे मोदी हे पहिले पंतप्रधान असावेत. देशभरात मात्र अनेक फेसबूकवीरांनी आपला भाव वाढावा यासाठी मोदींच्या परदेश दौर्‍यावर विनोदांची मालिका देण्यातच धन्यता मानली आहे. वास्तविक पाहता गेल्या अनेक वर्षात सत्ताधार्‍यांकडून अशाप्रकारचे परराष्ट्र धोरण राबविले गेलेले पहायला मिळाले नाही.

पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर महिन्याभरातच मोदींनी भूतानचा पहिला दौरा केला. मोदींनी केलेला कोणताही दौरा केवळ पर्यटन म्हणून केलेला नाही. अर्थात या आधीच्या पंतप्रधानांनीही तसे केलेले नाही. कारण हा दौरा म्हणजे तुमच्या परराष्ट्र धोरणाचा  भाग असतो. म्हणजेच तुमच्या देशाच्या आर्थिक आणि संरक्षण विषयक धोरणांचा तो भाग असतो. कारण जागतिकीकरणानंतर परराष्ट्र धोरणात अमूलाग्र बदल झाले आहेत. त्यानुसारच मोदींनी आजवरचे आपले सर्व दौरे यशस्वी केल्याचे दिसून येते. ते पाहण्यासाठी मात्र डोळसपणा असावा लागतो. दुर्दैवाने त्याचा आपल्याकडे आभाव आहे.
मोदींनी आपल्या भूतानच्या दौर्‍यात वीज निर्मितीसाठी काही निधी जाहीर केला. या निधीतून भूतानमध्ये धरण आणि 4 जलविद्युत  केंद्रांची निर्मिती केली जाणार आहे. त्या बदल्यात भूतानकडून भारताला मोफत वीज पुरवठा केला जाणार आहे. याशिवाय नेपाळमध्येही धरणाची निर्मिती केली जाणार आहे. या दोन्ही प्रकल्पातून भविष्यात भारताला 83 टक्के वीज मोफत मिळणार आहे. वीजेची समस्या सोडविण्यासाठी सरकारने टाकलेले हे पाऊल महत्त्वाचे म्हणावे लागेल. भविष्यात शेतकर्‍यांना 24 तास वीज मिळण्याच्या दृष्टिने हा दौरा नक्कीच फायद्याचा ठरणार आहे.
याशिवाय मोदींच्या परदेश दौर्‍यातील महत्त्वाचा ठरलेला दौरा म्हणजे जपान. जपानकडून भारतातील औद्योगिक क्षेत्रासाठी मोठा निधी पुरविला जाणार आहे. 'डीएमआयसी' अर्थात 'दिल्ली-मुंबई इन्वेस्टमेंट कॉरीडॉर' मध्ये पुढील पाच वर्षाच्या कार्यकाळात जवळपास 30 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली जाणार आहे. हा मोदींच्या चाणाक्ष परराष्ट्र धोरणाचाच भाग आहे. याशिवाय जपानचे बुलेट ट्रेन तज्ज्ञ भारतात बुलेट ट्रेनचं जाळं पसरवण्यासाठी सहकार्य करणार आहेत.          
पंतप्रधान मोदींचा ऑस्ट्रेलिया दौरा हा अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरला. कारण तब्बल 28 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान ऑस्ट्रेलियात गेले होते. वास्तविक पाहता ऑस्ट्रेलिया हा कोळसा आणि युरेनियम पुरविणारा देश आहे. भारतात वीजनिर्मितीसाठी युरेनियमची गरज आहे. नरेंद्र मोदींनी ऑस्ट्रेलियाचे प्रमुख टोनी अबॉट यांच्याशी बातचीत करून युरेनियमचा पुरवठा करण्याची मागणी केली. हे मोदींच्या दौर्‍याचेच यश आहे. संवादामध्ये ताकद आहे, हे मोदींनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. कारण 28 वर्षे एखाद्या महत्त्वाच्या देशाचा दौरा पंतप्रधानांकडून होत नसेल तर मात्र ही खेदाचीच बाब आहे.
आपल्या शेजारीच असलेल्या श्रीलंका दौर्‍यामागे मोठा अर्थ आहे. चीनने अनेक वर्षे श्रीलंकेत आपले बस्तान बसविले होते. मात्र भारतातील सत्तांतरानंतर श्रीलंकेतही सत्तांतर झाले. श्रीलंकेतील सत्ताधारी महिंदा राजपक्षे यांचे सराकार उलथून तेथे मैथ्रिपाला सिरिसाला यांचे सरकार सत्तेत आले. अमिरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएच्या अहवालात श्रीलंकेतील सत्तांतरामागे भारतीय गुप्तचर संघटना रॉचा महत्त्वाचा वाटा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या सत्तांतरामुळे चीनचा श्रीलंकेतील हस्तक्षेप कमी होणार आहे. चीनने हंबनटोटा बंदरावर आपला लष्करी तळ बनविला आहे. श्रीलंकन सैनिकांना युद्धाचे प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली चीनने हा तळ केला होता. मात्र चीनचा उद्देश वेगळा असल्याचेही 2005 सालीच अमेरिकेने स्पष्ट केले होते. तरीही युपीए सरकारने याबाबत कोणतीही खबरदारी घेतली नाही.
मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर भारताचे गुप्तहेर खाते मजबूत झाले आहे. याचे सारे श्रेय भारताचे सुरक्षा सल्लागार आणि आयबीचे माजी अध्यक्ष अजित दोभल यांच्याकडे जाते. कारण गेल्या वर्षभरात देशात एकही मोठा दहशतवादी हल्ला झालेला नाही. त्यांनी पाकिस्तानला उद्देशून सांगितले की, ‘‘जर का पाकिस्तानकडून  मुंबईसारखा हल्ला झाला, तर मात्र तुम्ही बलुचिस्तान गमावून बसाल.’’ संरक्षणाचाच एक भाग म्हणून भारत सरकारने फ्रांसकडून 36 जेट विमानांची खरेदी केली. या खरेदीतून आम्ही स्व-संरक्षण करण्यास सज्ज असल्याचा इशारा दिला आहे. येमेन सारख्या घटनेतून भारताची गुप्तचर यंत्रणा किती मजबूत झाली आहे हे स्पष्ट होेते.
तब्बल 42 वर्षानंतर भारतीय पंतप्रधान कॅनडाच्या दौर्‍यावर गेले. या दौर्‍यात मोदींनी कॅनडाकडून अणुउर्जा निर्मितीसाठी आवश्यक असणार्‍या युरेनियमचा पुरवठा करण्याची विनंती केली. पुढील पाच वर्षे कॅनडा भारताला युरेनियमचा पुरवठा करणार आहे. वास्तविक पाहता छोटे देश म्हणून दुलर्क्षित केल्या गेलेल्या देशांकडे आणि खासकरून आशिया खंडातील देशाकडे मोदींनी विशेष लक्ष दिल्याचे पहायला मिळते.

याशिवाय नुकताच पार पडलेल्या चीन दौर्‍यातूनही मोदींनी चीनकडून भारतात मोठी गुंतवणूक आणली आहे. 26 करारांच्या माध्यमातून चीन जवळपास 22 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक भारतात करणार आहे. या गुंतवणुकीमुळे भारतातील उद्योग, स्टील, उर्जा, पायाभूत सुविधा आणि छोट्यामोठ्या उद्योगांना बळ मिळणार आहे. याशिवाय पूर्वाचलातील सीमारेषेचा प्रश्‍नही सामंजस्याने सोडविण्यावर या दौर्‍यात चर्चा झाली.
गेल्या वर्षभराच्या कार्यकाळात मोदी सरकारने ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाच्या अंतर्गत विविध देशातून भारतात गुंतवणूक आणली आहे. या गुंतवणुकीपोटी गुंतवणूकदारांना मोठ्याप्रमाणात जमिनीची आवश्यकता आहे. त्यासाठीच मोदींनी भूमि अधिग्रहण विधेयकाला हात घातला असल्याचं बोललं जात आहे. मात्र विरोधकांनी विरोध दर्शवला आहे. मोदींची ही वर्षभराची कारकिर्द पाहता सुरवात अच्छी झाली आहे असे म्हणता येईल. वास्तविक पाहता पंडित जवाहरलाल नेहरू हे 16 वर्षे 286 दिवस पंतप्रधान होते. इंदिरा गांधी 15 वर्षे 91 दिवस, राजीव गांधी 5 वर्षे 32 दिवस, पी.व्ही. नरसिंहराव 4 वर्षे 11 महिने, मनमोहन सिंह 10 वर्षे 4 दिवस पंतप्रधानदी विराजमान होते. म्हणजे हे सगळे मिळून एकूण 57 वर्षे सत्तेत होते तरीही ‘अच्छे दिन’ आले नाहीत, मात्र वर्षभरातच मोदींना ‘अच्छे दिन’ आणण्याचा तगादा लावणे योग्य ठरणार आहे का?






सागर सुरवसे
9769179823

Follow on twitter: @sagarsurawase 

Thursday 14 May 2015

संभाजी हा शिवाजी महाराजांचा लाडात वाढलेला, रायगडावर तरूणपणी टगेपणा करणारा, थोरातांची कमळा, तुलसी, गोदावरी आदी पोरींना नादी लावणारा, दारू पिणारा, शिवरायांना सोडून मोगलांना मिळणारा, महाराजांनी मोठ्या मिनतवारीने परत आणलेला, अखेर पन्हाळगडावर तुरूंगात ठेवलेला, महाराजांच्या मृत्युनंतर संतापून तुरूंगाचे गज तोडून रायगडावर आलेला जणू वेताळ. राजारामाला तुरूंगात टाकणारा, राजारामाची आई  सोयराबाईंना भिंतीत गाडून मारणारा, औरंगजेबाच्या हाती गाफीलपणामुळे लागलेला, त्याने ‘मुसलमान’ हो म्हटल्यावर ‘तुझी मुलगी देत असशील तर मुसलमान होतो’, असे बाणेदार उत्तर देणारा आणि शेवटी हालहाल करून करून (औरंगाजेबाकडून) मारला गेलेला असा उग्र प्रकृती, अविचारी, व्याभिचारी, शिवरायांचे राज्य बुडविणारा संभाजी असा, खोटा इतिहास  काही जातीयवादी इतिहासकांकडून रचण्यात आला. परंतु वस्तूस्थिती काही वेगळीच होती.  
संभाजी महाराजांचे जे दुर्गुण रंगविण्यात आले ते मुळी त्यांच्या वृत्तीत नव्हतेच. जे सद्गुण होते ते सांगण्यात आलेच नाहीत. ते वीर होते त्यांना प्रेमवीर बनवले, ते संस्कृत भाषेत निष्णात होते. हिंदी व संस्कृत भाषेत त्यांचे चार काव्यग्रंथ आहेत. वयाच्या 9 व्या वर्षापासून राजकारणाचे धडे घेत असतानाच वयाच्या 14 व्या वर्षी राजनीतीवरील ‘बुधभुषणम्’ हा संस्कृत भाषेतला ग्रंथ त्यांनी लिहिला. औरंगजेबाचा पुत्र मोअज्जम याच्या छावणीत शिवरायांनी त्यांना दोन वर्षे मनसबदार म्हणून पाठविले. 11व्या व 12व्या राजगडावरील सदरेवरून ते राज्यकारभारात लक्ष घालू लागले. वयाच्या 17 व्या वर्षी रायगडावर त्यांना युवराज म्हणून घोषित करण्यात आले. 19 व्या वर्षी पन्हाळा, श्रृंगारपूर आणि प्रभावलीचे सरसुभेदार म्हणून नेमले होते. मात्र हा सर्व इतिहास झाकून ठेवण्यात आला.                                           
शंभूराजांच्या पराक्रमाविषयीचा थोडासा आढावा घेऊयात. त्यांच्या पराक्रमाविषयीचा इतिहास सांगण्याचा मोह सार्‍या महाराष्ट्राला झाल्याशिवाय राहणार नाही. संभाजीराजांच्या पराक्रमाविषयी शाहीर योगेश म्हणतात,

देश धरम पर मिटने वाला
शेर शिवा का छावा था
महापराक्रमी परम प्रतापी
एकही शंभु राजा था..!


छत्रपती संभाजी महाराजांची कारकीर्द
शंभूराजांच्या प्रखर कारकिर्दीचा काळ होता तो 8 वर्षे आणि 8 महिने. एकाचवेळी अनेक शंत्रुंशी झुंज देणारा, सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज आणि मोगल हे चार शत्रू. त्यातही अवघे मराठी स्वराज्य बेचिराख करण्याच्या हेतुनिशी प्रतिज्ञा करून महाराष्ट्रात जातीनिशी (सात लाख फौजेनिशी) उतरलेला क्रूरकर्मा औरंगाजेब! शंभुराजांनी या अल्पकाळात एकही लढाई न हरता सुमारे सव्वाशे लढाया जिंकल्या. सात लाख फौजेशी आपल्या पंचवीस हजारांच्या बेताच्या सैन्याच्या सामर्थ्यानिशी उणीपुरी 9 वर्षे झुंज दिली. हा जगाच्या इतिहासातील अभूतपूर्व पराक्रम. असा ज्वलज्वलंत संभाजीराजा न भूतो, न भविष्यती...


वर्ष तीनसे बीत गये अब
शंभु के बलिदान को
कौन जीता कौन हारा
पुछ लो संसार को !


महाराजांची युद्धनीती
शंभुराजे आपल्या युद्धनीतीमध्ये शत्रूपक्षाचा जास्तीत जास्त विध्वंस करणे, रसद तोडणे, पाण्यात वीष कालवून शत्रूसेनेची हानी करणे आणि अनेक सेना एकाचवेळी अनेक ठिकाणी लढवणे या युद्ध तंत्राचा वापर करत, आपले सैन्य मोगलांच्या मानाने खूपच कमी हे लक्षात घेऊन त्यांनी ‘खच्चीकरणाची युद्धनीती’ अवलंबिली. शक्य तेथे आक्रमण व शक्य तेथे बचाव असे दुहेरी सूत्र त्यांनी वापरले. शत्रूची युद्धनीती (योजना) ओळखून त्या उधळून लावणे. त्यांती रसद व दळणवळण तोडून टाकणे आणि त्यांची उपस्थिती खिळखिळी करणे हा सुद्धा त्यांच्या युद्धनीतीचा भाग. जेव्हा मोगलांनी नाशिकजवळच्या अहिवंत गडावर हल्ला केला, तेव्हाच बर्‍हाणपूर व सुरत येथे हल्ले चढवून मराठी सेनेने त्यांना जर्जर केले. म्हणजे आपण विचार केला तर असे लक्षात येते की, शत्रूने एका भागावर हल्ला केला असता त्यांच्या दुसर्‍या भागावर हल्ला चढवणे आणि शत्रूचे चित्त विचलीत करून सोडणे.



 
दक्षिणेत सत्ता
1682 साली संभाजी महाराज वीस हजारांचे घोडदळ घेऊन म्हैसूरच्या दिशेने निघाले तेव्हा त्यांचे वय होते अवघे 25 वर्षे. सातारा, मिरज, हुबळी, धारवाडमार्गे चिकमंगळूरच्या ठाण्यावर जाऊन त्यांनी ताबा मिळवला. पुढे चिक्कदेवरायांशी लढाई करून चित्रदूर्ग येथेच आपला दक्षिणेतील सैनिकी तळ निर्माण केला. तेथून ते आपल्या सेनेसह मदुराईकडे रवाना झाले. चित्रदुर्गाहून टुमकूर, चिक्कबाळापूर, धर्मपुरी या मार्गाने त्रिचनापल्लीपर्यंत जाऊन त्यांनी त्याचा ताबा घेतला. नंतर मद्रासच्या दक्षिणेस (म्हणजे आत्ताचे चेन्नई) आपला अधिकार प्रस्थापित केला. औरंगजेबाला यश न मिळाल्याने तो आपल्याच सेनानींवर संशय घेऊ लागला. त्याने शहजादा मोअज्जम आणि दिलेरखान यांनी औरंगाबादेस बोलून घेतले. दिलेरखानाला कैद व शहजाद्याला नजरकैदेत ठेवले. अखेर बादशहाने पुन्हा त्यांना चांगलीच तंबी देऊन व त्याची समजूत घालून त्याला पुन्हा युद्धावर धाडला. दिलेरखानाने मात्र घोर नैराश्याने 20 सप्टेंबर 1683 रोजी आत्महत्या केली.
आता 1683-84 साली संभाजी महाराज गोव्याकडे वळाले. गोव्यातील फोंडा किल्ला त्यांनी सहज सर केला. राजा विजरेई कौंट द आल्व्हारो हा अपयश घेऊन 11 नोव्हेंबर 1683 ला मागारी फिरला. विजरेईला वाटले फोंडा प्रकरण झाल्यावर संभाजीराजे रायगडला परततील. परंतु शंभुराजे उलट अधिकच गोव्याच्या पोटात शिरू लागले. युद्धनिधीस मदत करण्यासाठी विजरेईने 24 नोव्हेंबर 1683 ला गोव्याच्या किल्ल्यावरील एका सभागृहात सभा बोलावली. त्याच दिवशी संभाजी महाराज आपल्या फौजेनिशी स्टीफन म्हणजेच जुवे बेटात उतरले. ते त्यांनी सहज सर केले. हे वृत्त कळताच विजरेई आल्व्हारो मोठी सेना घेऊन जुवे बेट जिंकण्यासाठी धावून आला. मात्र आतून व बाहेरून विजरेईवर जबरदस्त हल्ला झाला. विजरेई गोळी लागूनही गोव्यातून कसाबसा पळाला. त्याचा घोडा मात्र मराठ्यांच्या हाती लागला. ही शोकांतिका बघण्यासाठी खाडीच्या दोन्ही तिरावर गावकरी लोक जमले होते. शंभुराजे इतके बेभानपणे विजरेईचा पाठलाग करत होते की, त्याच्या मागे त्यांनी आपला घोडा नदीत घातला. संभाजी महाराजांच्या हल्ल्याने घाबरलेला विजरेई इतका गर्भगळीत झाला की, त्याने गोव्याच्या चर्चमधील सेंट झेवियरचे शव बाहेर काढून त्यांची प्रार्थना केली. एका कागदावर गोव्याचे सारे राज्य झेवियरला अर्पण केल्याचे त्याने लिहून दिले आणि त्याने गोव्याचे रक्षण करावे असे साकडे घातले.

चारित्र्यहीन धर्मगुरूंची धिंड  
संभाजीराजांनी गोव्यातील किल्ल्यावरच्या पाद्री लोकांचे झगे काढून घेऊन, हात मागे बांधून त्यांची गावातून धिंड काढली. ज्या धर्मगुरूंची राजांनी धिंड काढली त्यांच्यापाशी धर्म नव्हता आणि गुरूंचे चारित्र्यदेखील नव्हते. शंभुराजांचे पोर्तुगीजांशी युद्ध जितके राजकीय होते तितकेच धार्मिकही होते. या पाद्री लोकांनी हिंदुंना बाटवण्याचे, जे बाटण्यास तयार नाही त्यांना जिवंत मारण्याचा आणि पैसा उकळण्याचा सपाटा लावला होता.

बादशहा वैतागला
संभाजीराजांच्या पराक्रमाच्या वर्तांनी बादशहाचे डोके भणभणून गेेले होते. त्याने रागारागाने आपली पगडी जमिनीवर आपटली आणि शपथ घेतली की, ‘‘संभाजीला मारल्याशिवाय पगडी घालणार नाही.’’ तो म्हणतो, ‘‘टिचभर राज्य आणि बोटभर ताकदीचा हा वितभर तरूण आपल्या विस्तृत राज्याला बेजार करू शकतो, ही कल्पना मला सहन होत नाही.’’ मोगलांचा इतिहासकार महंमद हाशीम खाफी खान शंभुराजांबद्दल लिहितो की, ‘‘दृष्ट संभाजी हा, धामधूम आणि उच्छाद करण्यात नरकवासी काफर शिवा पेक्षा दहापटीने अधिक तापदायक ठरला.’’
संभाजीराजांची जलनीती, दुर्गनीती, युद्धनीती अप्रतिम होती. संभाजीराजांनी आपल्या गलबताची संख्या साडेपाच हजार पर्यंत वाढविली. सैन्य तर शिवरायांच्या सैन्याच्या पाचपट जास्त वाढविले. त्याच बरोबर त्यांनी केवळ राज्याचे रक्षण केले असे नाही तर राज्यदेखील वाढवले. एक इंग्रज लेखक लिहितो की, ‘‘नशीब इंग्रजांचे की तो (संभाजी महाराज) जास्त काळा जगला नाही. तो जर आणखी दहावर्षे जगला असता तर, इंग्रजांना भारतावर दीडशेवर्षे राज्य करायचे तर लांबच पण भारतात पाऊलसुद्धा ठेवता आले नसते.’’

दर्यावरून धोका
छत्रपती शंभुराजांनी आपल्या पाच हजार पाचशे गलबतांच्या सहाय्याने इंग्रजांना झोपवले. सिद्दीला नाचवले आणि पोर्तुगीजांना वाकवले. तीनशे पन्नास वर्षांपूर्वी शंभुराजे दर्यावरून (समुद्रावरून) राज्याचे रक्षण करतात आणि त्यांनी लिहून ठेवले आहे की, ‘‘आपल्या राज्याला धोका जमिनीवरून नाही तर दर्यावरून आहे.’’ आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान युगातील आपण आपल्या राजधानीचे सुद्धा रक्षण करू शकत नाही. आठवा 26 नोव्हेंबर 2008 चा मुंबईवरील हल्ला. आपले सरकार सांगते की, ‘‘आमच्याकडे बोट कमी होत्या’’ मग आपण ठरवावे की श्रेष्ठ कोण? संभाजी महाराज की आजचे सरकार?



तेज पुंज तेजस्वी आखे
निकल गयी पर झुका नही
दोनो पैर कटे शंभु के
ध्येयमार्ग से हटा नही

हात कटे तो क्या हुआं?
सत्कर्म कभी छुटा नही
जीव्हा कटी खुन बहाया
धरम का सौदा किया नही


शाहीर योगेश यांच्या या पंक्ती वाचल्या की, राहून राहून मनात विचार येतो की, एखादा व्यसनी, रंगेल, उग्र प्रकृतीचा, अविचारी, व्याभिचारी व्यक्ती राज्य इतके चालवू शकेल काय? शंभुराजे कोणत्याही गाफीलपणामुळे पकडले गेले नाहीत तर ते फितुरीमुळे पकडले गेले. त्यावेळी ते अवघ्या 32 वर्षांचे होते. त्या औरंगजेबाने त्यांचे डोळे फोडले. जीभ तोडली. हात कापले. तरीही संभाजीराजे झुकले नाहीत. धर्मासाठी बलिदान देणारा असा राजा कुणी पाहिला आहे का? परंतु हे शंभुराजे आमच्या महाराष्ट्राला माहितच नाहीत. किंबहुना ते जाणीवपूर्वक सांगितले गेले नाहीत.
आपले खापर पणजोबा बाळाजी आवजी चिटणीस यांना शंभुराजांनी हत्तीच्या पायी दिल्यामुळे याचा सूड मल्हार रामराव चिटणीस याने शंभुराजांच्या मृत्युनंतर 122 वर्षांनी घेतला आणि तोही सभासद बखरीच्या मुळच्या मसालेदार बखरीत खोट्यानाट्याचाच मसाला बेमालूमपणे घुसडून देऊन संभाजी राजांचे चरित्र लिहिले. संभाजी राजांना व्यसनी ठरवले यानेच. पन्हाळ्याच्या सुभेदाराला कैदी बनवले यानेच. स्त्रीयांशी अनैतिक संबंध चिटकविले यानेच! याच्याच कुपीक मेंदुने सोयराबाई राजेंना भिंतीत गाडून मारल्याचा जावईशोध याचाच! खरे तर सोयराबाईंनी आत्महत्या केली असल्याचे सांगितले जाते.
शंभुराजांबद्दल अटलबिहारी वाजपेयी लिहितात की, ‘‘व्यक्ती की पुण्याई, व्यक्ती की शक्ती, व्यक्ती का स्वत्त्व प्रकट होता है अंतिम क्षणो मे. संभाजी महाराज समझौता कर सकते थे, पर उन्होने वह नही किया. अगर वह शरीर से दुर्बल होते, अगर मन के कच्चे होते, जीस तरह के व्यसनो का उनके जीवन चरित्र मे उल्लेख किया जाता है, अगर उस तरह के व्यसन के वे शिकार होते तो, अंतिम परिक्षा मेे विफल हो जाते. लेकीन वे अंतिम परिक्षा मे सफल रहे. पिढीयो तक उनके बलिदानसे हमे प्रेरणा मिलेगी. उन्होने जीवन का क्षणक्षण, शरीर का कणकण स्वतंत्रता के लिए समर्पित किया.’’ ही किर्ती आहे माझ्या शंभुराजाची!


 
कोटी कोटी कंठो मे तेरा
आज जयजयकार है
मातृभूमी के चरणकमलपर
जीवन पुष्प चढाया था
है दुजा दुनिया मे कोई
जैसा शंभु राजा था?
क्योंकी वह शेर शिवा का छावा था!


जय महाराष्ट्र..!

सागर सुरवसे

9769 179 823 / 9665 899 823
 
Follow on twitter: @sagarsurawase 

Sunday 10 May 2015




 साधारणपणे मराठी वाचक हा मराठी भाषेव्यतिरिक्त इतर भाषेतील वृत्तपत्र, नियतकालिकं वाचण्याच्या फंदात पडत नाही. रविवार पुरवणी किंवा साप्ताहिक वा मासिक या पुढे तो फारसा सरकत नाही. राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नांवर वृत्तपत्रातील बातम्या किंवा फारतर एकादा लेख यापुढे त्याचे वाचन जात नाही. त्यामुळे त्याचे वाचन हे एकांगी  होण्याची दाट शक्यता असते. गेल्या महिनाभरात अनेक प्रश्न चर्चेला आले. त्यात प्रामुख्याने अरविंद केजरीवाल यांचा विजय आणि विजयानंतर आलेल्या मग्रूरीतून पक्षातील उभी फूट अशा अनेक रंजक घडामोडी पहायला मिळाल्या. यावर मराठीत फारशी काही साधक- बाधक चर्चा झाल्याचं वाचण्यात आलं नाही. मात्र या संदर्भात हिंदी भाषेतील अग्रगन्य असलेल्या 'पांचजन्य' या साप्ताहिकामध्ये एक सुंदर लेख वाचनात आला. याशिवाय 'डॉ. हेडगेवार और गांधी' हा एक माहितीत भर टाकणारा व महत्वपूर्ण लेख वाचनात आला. तसंच बंगालमधील एका विज्ञानवादी लेखकाची मुस्लिम कट्टरतावाद्यांनी केलेल्या हत्येबाबतीतला एक लेखवजा माहितीही 'पांचजन्य'च्या अंकात देण्यात आली आहे. हे तीनही लेख वाचकांनी जरूर वाचायला हवेत. एखाद्या विषयाच्या दोन्ही बाजू वाचल्याने आपले एक विशिष्ठ मत तयार होण्यास मदतही होते.
अनेककाळ सत्तेत असलेल्या काॅंग्रेस पक्षाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर दोनवेळा बंदी घातली. यापैकी सर्वप्रथम महात्मा गांधी यांच्या हत्येला संघच जबाबदार असल्याचा कांगावा करत बंदी घालण्यात आली होती. मात्र याच गांधींनी रा. स्व. संघ आणि त्याचे संस्थापक डॉ. केशव हेडगेवार यांच्या कार्यावर स्तुती सुमने उधळली होती. डॉ. हेडगेवार आणि महात्मा गांधी यांच्या भेटीबाबतचा एक सुंदर लेख यात प्रकाशित करण्यात आला आहे. या लेखातून अनेक गोष्टींची स्पष्टता होते. दोन महापुरूष जेव्हा भेटतात तेव्हा त्यांच्यात नक्की कोणत्या विषयावर बोलणी होते? याची उत्सुकता अनेकांना असते. 'पांच्यजन्य'मधील या लेखामुळे ती उत्सुकता पूर्ण होते.

1934 साली महात्मा गांधी वर्ध्यामध्ये काहीकाळ मुक्कामी होते. या दरम्यान ते राहत असलेल्या सत्याग्रह आश्रमाजवळच संघ स्वयंसेवकांचे शिबिर होते. गांधीजी रोज पहाटे फिरण्यासाठी बाहेर पडत. त्या दरम्यान त्यांची नजर या स्वयंसेवकांकडे गेली. 22 डिसेंबर रोजी शिबिराचे उद्घाटन झाले. त्यावेळी गणवेषातील दीड हजार युवक आणि गृहस्थी व्यक्ती बॅंडच्या तालावर एकसारखे संचलन करत होते. त्यांचा हा सर्व कार्यक्रम गांधीजी आपल्या आश्रमातून एकटक पाहत होते. स्वयंसेवकांची ही शिस्त पाहून, या शिबिराला भेट देण्याची आपली इच्छा असल्याचेे सहकारी महादेवभाई देसाई यांच्याजवळ सांगितले. त्यानंतर देसाई यांनी वर्धा जिल्ह्याचे संघचालक अप्पाजी जोशी यांच्याशी पत्रव्यवहार करून, महात्माजींची या शिबिराला भेट देण्याची इच्छा आहे. त्यामुळे भेटीसाठी आपण उचित वेळ सांगावी अशी विनंती केली.
त्यानंतर 25 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता गांधीजी शिबिरस्थळी पोहोचले. त्यांनी शिबिराची संपूर्ण माहिती घेतली. संचलन, खेळ याचेही बारकाईने निरीक्षण केले. स्वयंसेवकांची ही शिस्त आणि अनुशासन पाहून गांधीजी अप्पाजींच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, " मी खरंच खूप खूष झालोय. संपूर्ण देशभरात इतकं प्रभावी दृश्य यापूर्वी मी केव्हाच पाहिलं
 नाही.''                                                     
महात्माजींनी हे पाहिल्यानंतर जाण्यापूर्वी संघाचे मुख्य कोण आहेत याची विचारणा केली. त्यावर अप्पाजी जोशींनी सांगितले, पूज्यनीय डॉ. केशव बळीराम हेडगेवार! त्यावर गांधीजी म्हणाले, ''मला त्यांना भेटायला आवडेल.' त्याच्या दुसर्या दिवशी डॉ. वर्ध्यातील शिबिरात आले. त्यांना गांधीजी येऊन गेल्याची माहिती देण्यात आली व त्यांनी भेटण्याची इच्छा व्यक्त केल्याचही सांगण्यात आल. त्यानुसार सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांनी रात्रीच्या जेवणानंतर गांधीजींची भेट घेतली. पुण्याचे डॉ. अण्णासाहेब भोपटकर आणि अप्पाजी जोशीही त्यांच्यासमवेत उपस्थित होते.
डॉ. हेडगेवार आणि गांधीजी यांची जवळपास तासभराची भेट झाली. या भेटीत गांधीजींनी संघाच्या शिस्तीचे रहस्य, कमी खर्चात जेवणाची व्यवस्था कशी करता?  याशिवाय डॉक्टरजी आपण अनेक वर्ष कॉंग्रेसमध्ये होतात, मग संघटनेत राहून हे काम का नाही केले? स्वयंसेवकाबाबत तुमची काय कल्पना आहे? असे अनेक प्रश्नही गांधींनी हेडगेवारांना केला. त्याला डॉक्टरांनी दिलेली उत्तरही तितकीच परखड आहेत. त्यामुळे हा लेख  वाचकांनी आवर्जून वाचावा.
        दुसरा लेख म्हणजे अरविंद केजरीवाल यांच्या वाणी आणि कृतीमधील विरोधाभास विशद करणारा आहे. महत्वाचं म्हणजे, योगेंद्र यादव, प्रशांत भूषण यांना केजरीवाल यांनी कशापध्दतीने बाजूला सारले याचे उत्तम विश्लेषण या लेखात करण्यात आले आहे. केजरीवाल यांचे आजी, माजी सहकारी मयंक गांधी, आशुतोष, अंजली दमानिया, शाजिया इल्मी, किरण बेदी, 'आप'चे खासदार भगवंत मान या सर्वाचे वक्तव्य लेखाच्या सुरूवातीलाच देण्यात आले आहेत. त्यामुळे केजरीवाल यांचा ढोंगीपणा समजण्यास मदत होते.
या लेखात पक्षातील अनेक महत्वाचे आणि कळीचे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
• अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पद आणि पक्षाचे संयोजक पद स्वत:कडे ठेवणे योग्य आहे का? हे पक्ष तत्त्वाच्या विरोधात नाही का?
• एक व्यक्ती एक पद या तत्त्वाचे काय?
• पक्ष आणि सरकार एकाच व्यक्तीच्या भोवताली फिरत असेल तर मग इतर पक्ष आणि आप यात काय फरक राहिला?
• दिल्ली विधानसभा निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 23 व्यक्तिंना उमेदवारी का देण्यात आली?
• डझनभर लोकाना पैसे घेऊन टिकीट दिल्याचा आरोप होत असताना, पक्ष जर तत्त्वावर चालणारा असेल तर याची चौकशी का होत नाही?
• निवडणुकीआधी 'आप'ने कॉंगेस आणि भाजप पक्षांतर्गत माहितीचा अधिकार लागू करण्याची मागणी केली होती. मात्र आप पक्षात हा नियम का लागू केला जात नाही.
• पक्षाच्या निर्णयात पारदर्शकतेचा अभाव का ? तसेच पक्षातील निर्णय हे गुपचुपपणे व काही लोकांशीच चर्चा करून का केले जातात?
• योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांची राजकीय व्यवहार समितीतून हकालपट्टी का करण्यात आली? याबाबतीत खासदार भगवंत मान यांचे वक्तव्यही याचे उत्तर देऊन जाते. याशिवाय जातीयवादाचे एक उदाहरणही या लेखात देण्यात आले आहे.
वरील सर्व प्रश्नांचे उत्तर या लेखात सविस्तरपणे व पुराव्यानिशी देण्यात आली आहेत. अखेर काय तर, सत्ता चांगल्या व्यक्तिला कशी भ्रष्ट,  स्वार्थी व नैतिकताहीन बनवते याचे जिवंत उदाहरण या लेखातून आपल्याला पाहायला मिळते.

याशिवाय 'पांचजन्य'मधील आणखी एक माहितीवजा लेख मुस्लिम कट्टरतावादाचा पर्दाफाश करतो. एक प्रसिध्द विज्ञानवादी बंगाली लेखक बंगलादेशातील एका राष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात आपल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर मुस्लिम कट्टरतावाद्यांनी या लेखकाची चाकूने भोसकून हत्या केली. अविजीत रॉय अस या लेखकाचं नाव आहे. त्यांच्या हत्येनंतर मुलगी तृषा अहमद हीने आपल्या फेसबूक वॉलवर आपल्या वडिलाच्या हत्ये बाबतची माहिती लिहिली आहे. तसंच तिने आवाहन केले आहे की, अशा मुस्लिम कट्टरतावादाला न घाबरता माझी ही आर्त हाक जगभर ऐकू जावी, अशी इच्छा ती व्यक्त करते. त्यावर रॉय यांच्या हत्येच्या निषेधार्त  बंगाली लेखिका तस्लिमा नसरीन, बंगलादेशी ब्लॉगर अरीफुर्रहमान, आसिफ मोहिनुद्दिन या लेखकांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
आपल्या ज्ञानात भर टाकण्यासाठी व समाजातील, देशातील, इतिहासातील वा जगभरातील दुसरी बाजू जाणून घेण्यासाठी साप्ताहिक 'पांचजन्यमधील हे लेख आवर्जून वाचलेच पाहिजेत. 
http://www.panchjanya.com/

 ( प्रकाशित लेख : 'विवेक विचार' मासिक, एप्रिल २०१५ ) 

सागर सुरवसे, 
पुणे
9769179823 / 9665899823
Follow on twitter: @sagarsurawase
Subscribe to RSS Feed Follow me on Twitter!